*१४ नोव्हेंबर*
*जागतिक मधुमेह दिन*
प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकाला मधुमेह, ६६ टक्के मुलांच्या रक्तात अतिरिक्त साखर, प्रत्येक तीन मधुमेहींमध्ये एक निराशाग्रस्त.. जागतिक मधुमेह दिनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या नावाखाली गेल्या काही दिवसांत असे अनेक पाहणी अहवाल प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र ही जागृती सरकार किंवा सामाजिक संस्था वा सरकारी रुग्णालयांकडून नव्हे तर आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या, देशभरात जाळे असलेल्या प्रयोगशाळा तसेच प्रसिद्धीशरण काही डॉक्टरांकडून सुरू आहे. भारतीयांना मधुमेहाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आसुसलेल्या या संस्थांकडून या अहवालाच्या आडून स्वार्थच साधण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मधुमेहाचे देशातील वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे. शहरी भागांतील श्रीमंत व्यक्तींचा मानला जाणारा हा आजार ग्रामीण भागांतही पोहोचत आहे व त्यासाठी जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत. मधुमेहाबाबत आजही अज्ञान असल्याने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपायांची जागृती होणे गरजेचे आहे. मात्र या दिनाचा आधार घेत स्वतची तुंबडी भरण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्या, औषध कंपन्या, प्रयोगशाळा सरसावल्या आहेत आणि जनसंपर्क कंपन्यांना हाताशी धरत प्रसिद्धी माध्यमांकरवी विविध भयचकित करणाऱ्या पाहण्यांचे निष्कर्ष गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.
जनजागृती न करता भीती निर्माण करून त्यातून नफा कमावण्याचा हा उद्योग आहे. मधुमेहाला कारणीभूत ठरणारे आहार, व्यायाम, जीवनशैली याबाबत जागृती न करता साखरेशी नाते जोडून त्यातून औषधे तसेच उत्पादने खपवण्यासाठी या पाहण्यांचे घोडे दामटले जाते. मुळात या पाहण्यांना शास्त्रीय निकष नसतो. तुम्ही वर्षभरात कधी निराश झाला होता का, अशा प्रकारची प्रश्नावली वापरून निराशाग्रस्त माणसांची पाहणी केली तर आपण सर्वच निराशाग्रस्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाबाबत जागृती व भीती यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे वर्धा येथील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सांगितले.
मधुमेहच नाही तर अनेक आजारांचा बाऊ करत ग्राहकांना भीती घातली जाते. वर्षांला तब्बल ऐंशी पाहण्यांचे पॅकेज देणाऱ्या प्रयोगशाळाही आहेत. मुळात यापैकी ८० टक्के पाहण्यांची रुग्णाला गरजच नसते. दहामध्ये एखाद्या पाहणीतील निष्कर्ष थोडे पुढे- मागे होऊ शकतात. मात्र त्याचा बाऊ करत रुग्णाला अधिकाधिक पाहण्या व त्यानंतर उपचारांसाठी तयार केले जाते.
हृदयरुग्णांवरील पन्नास टक्के अॅन्जिओप्लास्टी निर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन या काही लाखांच्या शस्त्रक्रिया होतात, असेही ते म्हणाले.
अहवालांचा फुगा आणि वास्तव
’ पाहणी – १५ वर्षांपर्यंतच्या ६६ टक्के मुलांच्या रक्तत अतिरिक्त साखर.
’ वास्तव – भारतात लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून कमी आहे. ज्या प्रयोगशाळेने ही पाहणी प्रसिद्ध केली तिथे २०१२ ते २०१४ या वर्षांमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले. त्यातही या तीन वर्षांत एकाच मुलाचे किती वेळा नमुने तपासणीसाठी आले याचा कोणताही उल्लेख पाहणीत नाही. त्यामुळे आजारी मुलांच्या पाहणीतून निष्कर्ष काढून तो सरसकट सर्व मुलांना लावला गेला आहे.
सहा भारतीयांमागे एक मधुमेही
चाळीशी पार केलेल्या शहरी भागांतील व्यक्तींसाठी ही पाहणी साधारणपणे लागू होते. मात्र त्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही. चाळीस वर्षे पूर्ण केलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरी भागात साधारणत १२ ते १५ टक्के तर ग्रामीण भागात ७ ते १० टक्के लोकांना मधुमेह असण्याची शक्यता आहे.
****
तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त
दर तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त असल्याचा निष्कर्ष कोणत्याही पाहणीअंती निघालेला नाही. विविध पाहण्यांचा एकत्रित अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढण्याची पद्धत वापरून ही माहिती देण्यात आली आहे. निराशा हा आजार शोधण्याची पद्धतीही काही वेळा अशास्त्रीय असू शकते.
अनेक पाहण्या या विशिष्ट गटाशी संबंधित असतात. त्यांना प्रातिनिधिक किंवा शास्त्रीय म्हणता येणार नाही. आहार, विहार यासोबत योग्य औषधांमुळे मधुमेह काबूत ठेवता येतो.
Nice information Megha
ReplyDeleteThank you
ReplyDelete