**मध कसे तयार होते.**
मध तयार करतात मधमाश्या. फेब्रुवारी महिना उजाडला की दिल्लीमध्ये उंच इमारतींमधल्या खिडक्यात मधमाश्यांची मोठमोठी पोळी लटकताना दिसतात, कारण त्या सुमाराला तिथला हिवाळा संपून वसंत ऋतूचा आरंभ होत असतो. त्यामुळेच जिकडे तिकडे फुलांना बहर यायला लागतो. या फुलांमध्ये असलेल्या केसरापासून व मधुपर्कापासून मधमाश्या मध तयार करतात. मधमाश्यांच्या जीभा लांबलचक नळीसारख्या असतात, आपण बाटलीतला रस किंवा द्रवपदार्थ जसा स्ट्राॅचा म्हणजे नळीचा वापर करून शोषून घेतो तशाच प्रकारे मधमाश्या फुलांमधला मधुपर्क शोषून घेतात. त्यांच्या पोटात तो साठवला जातो. तिथ असलेल्या प्रथिनांशी आणि विकराशी त्यांची विक्रिया झाली की त्या मधुपर्काचं मधात रूपांतर होतं. मधमाश्यांच्या पोळ्यामध्ये मेणानं बनवलेले षटकोनी आकाराचे अनेक कोष असतात. आपल्या पोटातला मध मग त्या मधमाश्या त्यापैकी एका कोषात ओकतात. त्या मधातलं पाण्याचं प्रमाण जास्त असतं. साधारण ८० टक्क्यांपर्यंत ते असतं ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी मग त्यावर आपले पंख फडफडावून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं. अशा तर्हेनं दाट झालेल्या मधाने तो कोष भरला की मेणानं तो सीलबंद केला जातो आणि दुसरा कोष भरून टाकण्याच्या कामाला त्या मधमाश्या लागतात. सारं पोळं अशा प्रकारे मधानं भरेपर्यंत हे काम चालूच राहतं. तेव्हा मधमाश्या जरी मध तयार करत असल्या तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल फुलं धारण करणाऱ्या वनस्पतीच पुरवतात. थोडक्यात, मध म्हणजे प्रक्रिया करून मूल्यवृद्धी केलेला वनस्पतीजन्य पदार्थच आहे
No comments:
Post a Comment