Tuesday, 7 April 2020

जलसंधारण

💐जलसंधारण 💐
पाऊस हा सर्वात शुद्ध नैसर्गिक जलस्रोत आहे. परंतु पावसाचे पाणी ढगांतून जमिनीकडे प्रवास करताना त्याचे सूक्ष्म जलबिंदू भोवतालच्या हवेच्या संपर्कात येतात. या हवेत असलेले आणि पाण्यात सहजपणे विरघळणारे विविध प्रकारचे प्रदूषक वायू, धूलिकण या पावसाच्या पाण्यात मिसळतात. अंतिमत: हे पावसाचे पाणी घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पडते तेव्हा त्यामध्ये पक्ष्यांची विष्ठा, धूळ  आणि इतर कचरा मिसळतो. यामुळे  हे पाणी अशुद्ध होते. हे पाहता, पावसाचे पाणी जलसंधारणाद्वारे वापरात आणण्यापूर्वी गाळणे आणि शुद्ध करणे आवश्यक असते.

ते करण्यासाठी विविध पर्याय आहेत. हे पाणी कशासाठी वापरले जाणार आहे, त्यावर उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय वापरावा हे ठरवता येते. जर पावसाचे पाणी शौचालयाच्या फ्लश टँक्ससाठी, वाहने धुण्यासाठी, बागेतील झाडांना घालण्यासाठी, अग्निशमन यंत्रणेसाठी आणि तत्सम दुय्यम गोष्टींसाठी वापरायचे असेल, तर साध्या वाळूच्या गाळण पद्धतीचा वापर करता येईल. परंतु हे पावसाचे पाणी आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि अगदी पिण्यासाठीही वापरायचे असेल, तर हे पाणी वाळूच्या गाळणीतून प्रवाहित झाल्यानंतर ते कार्बन पावडर (अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल) अथवा जेलच्या गाळण यंत्रातून प्रवाहित करून पुढे अतिनील किरण (अल्ट्राव्हॉयोलेट रेज्) तसेच ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशुद्ध करण्यात येते. अशा प्रकारची गाळण यंत्रणा गच्चीवरील पाणी खाली वाहून नेणाऱ्या नळांमध्ये बसवता येते. याचा एक फायदा असा की, गच्चीवरून खाली वाहणाऱ्या पाण्याच्या स्तंभाच्या दबावामुळे गाळण प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अनेकदा हे पाणी परत उलटे फिरवून गाळण माध्यमातून प्रवाहित केले जाते. यामुळे त्या गाळणीची भोके खुली राहतात.

शोष खड्डय़ांमध्ये मात्र एवढी प्रगत गाळण यंत्रणा वापरण्याऐवजी विविध आकारांच्या दगड-गोटय़ांचे थर तयार करून त्यावर बारीक वाळूचा थर पसरविण्यात येतो. या शोष खड्डय़ाला जोडलेल्या नळाच्या टोकाला जाळी असतेच. या नळाद्वारे गुरुत्वाकर्षणाच्या उच्च दाबाखाली वाहून शोष खड्डय़ात आलेले पाणी या नैसर्गिक गाळण्यातून प्रवाहित होऊन जमिनीत मुरते आणि जमिनीच्या पाणीसाठय़ात भर घालते. परंतु जमिनीत मुरणारे हे पाणी सर्व प्रकारच्या प्रदूषकांपासून मुक्त असायला हवे. अन्यथा अशी प्रदूषके जमिनीखालील भूजलात मिसळून जातील आणि हे भूजल प्रदूषित होऊन निरुपयोगी ठरेल.

Sunday, 29 March 2020

करोना व्हायरस बद्दल सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती

       *करोना व्हायरस बद्दल सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती*                                                    

 *व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. *कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस  एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे.
*व्हायरस  सजीव आणि निर्जीव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण तो दोघांचीही  लक्षणे दर्शवितो आणि म्हणूनच त्याला" biological puzzle" म्हणजेच "जैविक कोडे "असेही म्हटले जाते.
*कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. 
* व्हायरस  स्वतः प्रजनन करत नाही तर ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करतो.
 *व्हायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए केंद्रक आम्ल  असलेला एक कण असतो, जास्ती करून    आर एन ए /RNAआणि त्यावर एक प्रोटीनचे संरक्षक आवरण cover असते. जे आपल्या श्वेतपेशींवर म्हणजेच  WBC  वर असते. ते प्रोटीनचे आवरण किती मजबूत आहे किंवा व्हायरस ज्या पेशीत जाणार आहे त्या पेशीशी ते किती सारखे आहे  किंवा मिळतेजुळते आहे त्यावरून तो व्हायरस त्या पेशीत संक्रमित होणार की नाही ते ठरते.                                      
*आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून पेशीत गेल्यावर
 व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए पेशीतील मटेरियल वापरून स्वतःच्या खूप खूप कॉपी बनवतो.
 *ही प्रत्येक कॉपी हा एक नवा व्हायरस च असतो.आणि मग पेशीतील मटेरियल संपले की पेशींची वॉल फोडून हे सर्व व्हायरस कण बाहेर येतात आणि शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात.
*अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की मग होस्ट म्हणजे ज्याच्या शरीराच्या पेशींत व्हायरस संक्रमित झाला आहे तो प्राणी मग आजारी होतो. काही व्हायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्स मध्ये घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो.
 *हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्स्फर होतो. किंबहुना एखादा व्हायरस नेमका कधी अस्तित्वात ला हे प्राण्यांच्या डीएनएतील या बदलावरूनच कळते.
*व्हायरस हा सजीवच नसल्याने मग त्याला कोणत्याही औषधाने वा गोमूत्र वा कापूर वा धुराने किंवा पेस्टीसाईडने मारता येऊ शकत नाही.
 *मात्र कशानेही त्याचे बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झाले की व्हायरसही नष्ट होतो. हे हवेमुळे, पाण्यामुळे,
साबणामुळे, तापमानामुळे, उन्हामुळे असे कशामुळेही होऊ शकते. 
*होस्टच मिळाला नाही की एखादा व्हायरस जगातूनच नष्ट होऊ शकतो. व्हायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. जर व्हायरस मरुच शकत नाही तर मग डॉक्टर लोक जी औषधे देतात, करोनाची लस शोधण्यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला? असा प्रश्न पडतो .
*व्हायरस वर जी लस असते ती कशी काम करते त्या आधी व्हायरस कसा काम करतो ते पाहू. व्हायरस आधी शरीराच्या पेशींच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथे बॉण्ड बनवतो आणि तिथे चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्स मधून मग तो हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति किंवा आरएनए स्ट्रेण्ड (पट्टी) बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात.
* हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा व्हायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या व्हायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे व्हायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात आणि बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्स वर जाऊन चिकटतात व त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्स पैकी कोणत्याही एका स्टेपवर व्हायरसला ब्लॉक करते. हे ब्लॉकिंग रिसेप्टर्स वर असू शकते, ज्या लसीत असे केमिकल्स असतात जे व्हायरसचे रिसेप्टर्सशी बॉंडींग होऊ देत नाहीत, किंवा काही लसी व्हायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत.
 *काही लसी व्हायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी व्हायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही .
*आताचा करोना कोविड-19 हा नवा व्हायरस आहे, त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो, किंवा नेमका तो कोणत्या केमिकल्सनी डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय.
 *ते कळल्यावर मग कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणून त्याची लस लवकर बनत नाहीय.
*व्हायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात.
*व्हायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या व्हायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असे नाही. मात्र एका प्रजातीत असताना व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा व्हायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो.
* कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळे आणि खवल्या मांजरात असणाऱ्या करोना व्हायरसशी आढळले आहे. व्हायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही , त्यामुळे तो कोणत्या एखाद्या देशाने तयार करून सोडला आहे असे शक्य नसून तो recombination   mechanism असू शकतो ,परंतु तीही शक्यता कमी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतील व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे.     *. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्याने काही व्हायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या करोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमके माहीत नाही. उन्हाळ्यातील तापमानाने व्हायरसचे प्रोटीन नष्ट होऊन व्हायरस नष्ट होऊ शकतो.
 * कोविड-19 करोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही.हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने व्हायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन तो नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठेही अनावश्यक स्पर्श न करणे, जो कुणी शिंकत वा खोकत असेल त्याच्यापासून 3 फुट दुर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
 *करोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो म्हणून 3 फूट दूर राहीले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो.
* आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू, वा आजारी माणसाजवळ जात असू तरच मास्क वापरावा असे WHO ने सांगितले आहे. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो.
*करोनाचा mortality रेट हा 3.4% आहे. म्हणजे हा आजार 1000 माणसांना झाला तर त्यातील 34 माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारांत हा रेट 15% आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असे WHO म्हणते.
*SARS या आजाराचा मृत्युदर हा 10% तर MERS चा 34% इतका म्हणजे करोनाच्या दहापट जास्त होता. व्हायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो, आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो.स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.
 ***विद्यार्थी मित्रांनो आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. घाबरून जाण्यासारखे काही नाही.  

**आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. गर्दीत जावू नये व  कुटुंबीयांनाही जावू देवू नये.          

Tuesday, 17 March 2020

वाचवा चिमणीला

🎯 *जागतिक चिमणी दिन*
💐💐🙏🏼
मुंबईसारख्या महानगरांत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी – आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.

भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.

‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
➖➖➖➖➖➖➖

*दिनांक-१८ मार्च २०२०*
➖➖➖➖➖➖➖

Thursday, 20 February 2020

DNA

*२१ फेब्रुवारी १९५३*

*फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.*
डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल (इंग्लिश: Deoxyribonucleic acid, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड ;) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदू मध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्‍लिइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच डीएनए होय. डीएनए मध्ये जीवा बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचने मध्ये स्वरूप ठरव्यात हे महत्त्वाचे घटक असतात. जसे की मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्ती ओळख करता येते करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेंसिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्तिच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए आढळते. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रीच माईसचर याने एका वापरलेल्या सर्जिकल बँडेजमधील पू व रक्त यामधून एक सुक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला 'न्युक्लिईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लिईन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले. डीएनए मध्ये कोडींग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तिंचा वेगळा असतो. व्यक्तिचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात. डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादि नमुन्यातून डीएनए वेगळे केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रुपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात. एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत. सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.उदाहरणार्थ -- १) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात. २) डीएनए चाचणीचा वापर करून बीबियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मश्रुमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो. ३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तिचे, प्राण्याचे, वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते. ४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व पितृत्त्व सिद्ध करता येते.


Algae /शैवाल

📙 *शैवाल/शेवाळ (अल्गी)* 📙 
******************************

सर्वात साधा वनस्पतीचा प्रकार म्हणजे शैवाल. मुख्यत: अपुष्प व बीजहीन या प्रकारात ही वनस्पती मोडते. गोड्या वा खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे. जेथे मुबलक पाणी आहे, तेथे शैवाल असणारच. एखादा खडबडीत आधार शोधून या वनस्पतीची वाढ सुरू होते. गोड्या पाण्यातील शैवालाचा रंग हिरवा असतो, तर समुद्र शेवाल लालसर तपकिरी रंगावर असते.

 हरितद्रव्याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही वनस्पती स्वतःचे अन्न बनवते. त्यावरच तिची वाढ व पोषण अवलंबून असल्याने पाण्यात जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथेवरच शेवाळाची वाढ झालेली दिसून येते. अतिसूक्ष्म सागरी शेवाळाच्या खाद्यावर छोटे मासे वाढतात. प्लांक्टन वनस्पती या नावाने ती ओळखली जाते.

 साचलेल्या गोड्या पाण्यावर अनेकदा या वनस्पतीचा थर साचलेला आढळून येतो. एकात एक धागे व तंतू गुंतत जाऊन हा सलग थर एखादा गालीचा पसरावा, तसा पसरलेला असतो. विविध तापमानाच्या पाण्यात तगून राहणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल. जवळपास शून्याची रेंगाळणारे बर्फाळ पाणी असो किंवा एखाद्या उष्ण झर्‍यामुळे गरम झालेले पाणी असो, दोन्हींमध्ये शैवाल असणारच. एवढेच काय, पण एखादा डोंगरकड्यावरून वाहणारा प्रवाह असेल, तर त्याच्या संपूर्ण उतारावरही ही वनस्पती आढळते.

 साऱ्या जगातील विविध समुद्रांतील समुद्रशैवालाचे ७००० विविध प्रकार आजवर सापडले आहेत. पाण्याचे व शैवालाचे अतूट नाते आहे, असे समजावयास हरकत नाही.

 निळे व हरित शैवाल पृथ्वीतलावरील अगदी पुरातन स्वरूपाचे सजीव अवशेष मानले जातात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सापडलेल्या अश्मीभूत अवशेषात शैवाल सापडले असून त्याआधीचे सजीव आज तरी ज्ञात नाहीत.

पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळले तर पाण्यात सजीवांची सुरुवात झाली. त्यांतील पाण्याबाहेर पडलेली पहिली वनस्पती म्हणजे शेवाळे. पाण्यातील शेवाळाची एक जात म्हणजे प्लांक्टन. जमिनीवर आली की तिला शेवाळे वा माॅस म्हणतात. अशी ही अगदी पुरातन पण प्राथमिक स्वरूपाची वनस्पती बुरशीपेक्षा वेगळी असते. सहसा शेवाळाचे एकच रोप सापडणार नाही; कारण एकाच वेळी हवेतून, पाण्यातून, वाऱ्याद्वारे पसरलेल्या असंख्य स्पोअर्सद्वारे ही वनस्पती अन्य ठिकाणी पसरते व रुजते. त्यामुळे एका जागी पडलेली डझनावारी स्पोअर्स पडून तशीच ओलाव्याची वाट पाहत राहतात. जेव्हा पाऊस, ओल, पाण्याचा पुरेसा पुरवठा मिळेल, तेव्हा ती लगेच रुजतात. त्यांची मुळे थोडय़ाशाही खडबडीत भागात झटकन पकड घेतात. खरे म्हणजे मुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या केसाइतक्या बारीक केशवाहिन्या खडबडीत भागाच्या अगदी छोटय़ाशा भोकातही पकड मिळवतात.

 शेवाळाची वाढ फार झपाट्याने होते. आठवड्याभरापूर्वी स्वच्छ दिसणारा एखादा खडक पावसाळय़ात बघताबघता हिरवट दिसू लागतो. महिन्याभराने त्याच्यावरचा बोटभर जाडीचा हिरवागार गालीचा मन मोहून टाकतो. पावसाळा संपता संपता त्यालाच छोटे छोटे दांडे येऊन त्याच्या टोकाला असलेल्या पिशवीतून पुन्हा स्पोअर्स बाहेर पडतात. काही वेळा पावसाचे थेंब या पिशव्या उघडण्याचे काम करतात. आता मूळ वनस्पती वाळून गेली व ती वाळल्यामुळे करड्या रंगाचे तुकडे पडले, तरी पुढच्या पुनरुत्पादनाची सोय झालेली असते.

पर्जन्यवनांमध्ये शेवाळे सर्वत्र आढळते. दाटच्या दाट थर असलेले शेवाळे हे झाडांवरही खूप उंचापर्यंत पसरलेले असते. वाळलेले ओंडके तर शेवाळलेलेच असतात. शेवाळ्यावरून पाय घसरून आपटी खाल्ल्याची आठवण नसलेले मूल क्वचितच आढळते, नाहीत का ?

Thursday, 6 February 2020

व्यसन

📙 *व्यसनाधीनता* 📙
**********************

 व्यसन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणे. व्यवहारात व्यसन हा शब्द एखाद्या वाईट सवयीबद्दल, तिच्या आहारी जाण्याबद्दल वापरला जातो. तंबाखू खाणे, सिगारेट वा विडी ओढणे, तपकीर ओढणे, दारू पिणे, सुपारी खाणे, अफू, हेरॉईन, गांजा यांचे सेवन करणे - या बाबतीत जेव्हा स्वतःच्या इच्छेनुसार एखादा माणूस ही गोष्ट थांबवू शकत नाही, तेव्हा तो या बाबतीत व्यसनाधीन झाला आहे, असे समजतात. सवय व व्यसन या बाबतीतील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे, हेही तितकेच खरे.

 सुपारीच घ्या ना. जेवणानंतर सुपारी खावीशी वाटते, हा सवयीचा भाग. पण सुपारी मिळाली नाही तर अस्वस्थपणा येणे, चैन न पडणे, व्यवहार न सुचणे हा व्यसनाचा भाग. काही पदार्थांच्या बाबतीत ही फक्त सवय असते. ती निग्रहाने सुटणे शक्यही होते. पण बर्‍याच बाबतीत व्यसनाधीनता म्हणजे त्या माणसाच्या शरीरातील, रक्तातील विशिष्ट द्रव्याचे प्रमाण कमी झाले म्हणून शरीर आतून मागणी करू लागते. म्हणजे सिगारेट ओढणारा व तंबाखू खाणारा यांच्या बाबतीत रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होऊ लागले की, तलफ येऊ लागते. ते प्रमाण योग्य पातळीवर पोहोचले की समाधान होते. या बाबतीत दारू वा अल्कोहोलची तीच गोष्ट आहे. रक्तातील ठराविक प्रमाण जसे कमी होईल, तशी मेंदूकडे संवेदना पाठवली जाऊन व्यसनी माणूस पुन्हा दारूची मागणी करू लागतो. नाही मिळाली, तर प्रथम अस्वस्थ होतो. नंतर चिडचिडा बनतो, नंतर रागावतो, घामाने डबडबू लागतो, थरकाप होऊ लागतो. ही सगळी व्यसनाधिनतेचीच लक्षणे आहेत.

 पण सिगारेट, दारू, तंबाखू, तपकीर यांचे 'व्यसन' लागायला अनेक दिवस त्यांचे सेवन करणे जरुरीचे असते. एखाद्या आठवड्याभरात या गोष्टींची सवय लागली व व्यसन जडले, असे सहसा घडत नाही, याउलट गांजा, हेरॉईन, अफू, कोकेन इत्यादी मादक पदार्थांबाबतीत मात्र जेमतेम पाच ते सहा वेळा या द्रव्यांच्या संपर्कात आल्यानंतर लगेच माणूस या द्रव्यांच्या आहारी जातो. या अमली पदार्थांना हातही न लावणे याचं कारणाकरता अत्यंत आवश्यक असते. 'एकदाच चरस वा गांजाची चिलीम ओढून बघू, मला व्यसन लागणे शक्यच नाही' असा प्रकार सहसा घडत नाही. पहिल्या चिलमीचा हा परिणाम संपतानाच शरीर दुसर्याची मागणी करू लागते. ही मागणी धुडकावणे जवळपास शक्य होत नाही. काय चालले आहे, ते कळायच्या आत माणूस त्या व्यसनाचा कच्छपी लागलेला असतो.

 नदीच्या शांत पात्रात एखादा भोवरा असतो. पोहणारा त्या भोवर्‍याकडे कुतूहलाने बघता बघता आत ओढला जातो. गरागरा फिरताना पाण्याच्या तळाशी कधी गिळला जातो, ते कोणालाच कळत नाही. ज्यांना अलीकडे 'ड्रग्ज' किंवा अंमली पदार्थ म्हणतात, त्यांच्या सेवनानंतर अशीच स्थिती होते.

 यावर उपाय आहेत. ते म्हणजे दोनच. अंमली पदार्थांना अजिबात हात न लावणे, दूर राहणे हा पहिला. दुसरा म्हणजे चुकून व्यसनाधीन झाल्यास तज्ज्ञ उपचारांकरवी त्यातून मुक्तता मिळविण्याचा. पहिला उपाय शंभर टक्के यशस्वी, तर दुसऱ्यामध्ये जेमतेम पन्नास टक्केच यश मिळते.

 कोणता मार्ग चांगला, ते तुम्हीच सांगा ना ! 

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून

Monday, 16 December 2019

circulatory system

📙 *रक्ताभिसरण संस्था* 📙
***************************

 एकपेशीय अमिबापासून बहुपेशीय प्राण्यांकडे वाटचाल होताना एका महत्त्वाच्या अडचणीकडे निसर्गाचे लक्ष्य गेले असावे. ती अडचण म्हणजे असंख्य पेशींनी बनलेल्या प्राण्यांच्या सर्व पेशींचे पोषण कसे करायचे ? यावरचा तोडगा म्हणून निसर्गाने रक्ताची निर्मिती केली असावी. अर्थातच या रक्ताला संपूर्ण शरीरात थेटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रक्ताभिसरण संस्थेकडे सोपवली गेली. रक्ताचे शुद्धीकरण उत्सर्जनसंस्था करते, तर रक्तातील लाल पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा श्वसनसंस्था करते. रक्तातील लाल, पांढऱ्या व प्लेटलेट पेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. हृदय हा आजीवन चालू राहणारा पंप विशिष्ट स्नायूंनी बनलेला असतो. स्वनिर्मित विद्युतसंवेदनाद्वारे हृदयाचे काम चालू असते. पण ही संवेदननिर्मिती का थांबते व कशी सुरू होते, हे अजूनही गूढच आहे. हृदय या पंपाची क्षमता चौपटीनेसुद्धा गरजेनुसार वाढू शकते.

 मानवी हृदयाला चार कप्पे असतात. वरचे कप्पे कर्णिका, तर खालचे जवनिका या नावाने ओळखले जातात. हृदयाच्या डाव्या जवनिकेतून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, तर उजवा जवनिकेतून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त पाठवले जाते. तेथून आलेले प्राणवायुमिश्रीत शुद्ध रक्त डाव्या कर्णिकेत येते. याउलट शरीराकडून परत आलेले अशुद्ध रक्त उजव्या कर्णिकेत येते. प्रथम कर्णिका व नंतर जवनिका यांचे आकुंचन व प्रसरण चालू राहून रक्ताभिसरण कायम राखले जाते. महारोहिणीच्या असंख्य शाखा फुटून त्यांचे रूपांतर केशवाहिन्यांत होते व त्यानंतर नीलांची सुरुवात होते. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळचा दाब व प्रसारणाच्या वेळचा दाब हा रक्तदाब म्हणून मोजला जातो.

 सर्वच प्राण्यांमध्ये रक्त व रक्ताभिसरणसंस्था कार्यरत असते. मात्र रक्तपुरवठ्याच्या गरजा प्राण्याच्या आकारमानाप्रमाणे बदलतात. जिराफाच्या आकारापेक्षा त्याची मान खूपच उंच असते. त्याच्या मेंदूला लागणारा प्रचंड रक्ताचा पुरवठा करण्यासाठी त्याच्या हृदयाचा आकार व रक्तदाब दोन्ही जास्त असतात. याउलट सरपटणाऱ्या सर्वच प्राण्यांचे आकार छोटे असोत वा अजस्र, पण हृदयाचा आकार लहानच असतो. कासवाच्या हृदयाला तीन कप्पे असतात. मगरीच्या हृदयाला तीन कप्पे असले, तरी डावी जवनिका एका पडद्याने विभागलेली असते. गायीगुरांमध्ये माणसाप्रमाणेच हृदयाला चार कप्पे आढळतात.

 सरपटणारे प्राणी व पाठीचा कणा असलेले सस्तन प्राणी यांच्या रक्ताभिसरणक्रियेत एक महत्त्वाचा घटक बदल घडवतो. सस्तन प्राण्यांच्या खांद्यातून त्यांना मिळणाऱ्या ऊर्जेचे स्वरूप शर्कराज्वलनातून मिळणाऱ्या कॅलरीज असे असते. त्यामुळे त्वचेचे तापमान योग्य राखून विविध हवामानाला तोंड देणे याला रक्ताभिसरणसंस्थेची मदत मिळते. शून्याखालील तापमानापासून पन्नास डिग्री सेंटीग्रेड इतक्या उष्ण तापमानाला तोंड देणे यामुळेच शक्य होते. त्वचेखालील रक्तवाहिन्यांचे प्रचंड मोठे जाळे व त्वचेची त्याला मदत होते. त्वचेबाहेर टाकला जाणारा घाम शरीराचे तापमान कमी करतो, तर थंडीत रक्तवाहिन्यांचे आकुंचन शरीराची उष्णता कायम राखते. याउलट सरपटणारे प्राणी तापमानातील बदल व सततचा तीव्र सूर्यप्रकाश सहन करू शकत नाहीत. उष्ण रक्ताचे, असे जरी सस्तन प्राण्यांचे वर्णन असले व सरपटणाऱ्या थंड रक्ताचे आपण समजत असलो, तरी बाह्य तापमानाइतकेच त्यांचे रक्ताचे तापमान राखले जाते. रक्ताभिसरण संस्थेचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे काही कारणाने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊन रक्तस्राव सुरू झाला, तरी तेथे रक्त गोठविण्याची प्रक्रिया सुरू करून रक्तस्राव थांबवणे. रक्ताभिसरणसंस्था तात्काळ या कमतरतेवर मात करण्यासाठी कामाला लागते व जेमतेम आठवड्याभरात ही तूट भरून काढली जाते. मात्र रक्तस्रावामुळे वीस टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लिटरपेक्षा जास्त तूट निर्माण झाली व ती काही वेळात भरून काढली गेली नाही तर प्रमुख इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर कायमचे दुष्परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होतो.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...