"लॉकडाऊनमुळे बदललेले जग"
मागील चार महिन्यापासून आपला देश लॉकडाऊन चा अनुभव घेत आहे .अनेकदा मनात डोकावून बघितले तर असं वाटतं की जगभरात विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निसर्गाचे पुनर्स्थापन होते आहे. लॉकडाऊननंतर काय होणार ही खरोखर मोठी आणि गंभीर समस्या आहे. महामारी एका रात्रीतून संपणार नाही किंवा टाळ्या वाजवून आणि दिवे पेटवून तिची तीव्रता कमी होणार नाही. तसेच विषाणू ग्रस्त शहरे सहजपणे शांत होणार नाहीत. खेडी आणि लहान शहरात स्थलांतरित मजुरांची गर्दी झाली आहे. ते रिकाम्या खिशाने घरी परतले आहेत. ते आगामी काही महिन्यात उदरनिर्वाह कसा करतील? शेतकरी बाजारात आपली पिके कसे विकतील ?ट्रक वाले व वाहतुकीची साधने कुठे आहेत ?गरजेचे पण महाग साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा कुठे आहे ?बहुतांशी लहान व्यवसाय बंद आहेत. मोठे व्यवसायही ही ऑक्सिजनवर आहेत. लाखो लोक बेरोजगार आहेत . शहरांमध्ये नोकऱ्या सुरू झाल्या तरी हे लोक विषाणू संक्रमित शहरात परत जातील का ?त्यापैकी बहुतांश शहरे अधिकृतरित्या करोना मुक्त आहेत का ? हे लोक परतले तर त्यामुळे विषाणू हल्ल्याचा पुढील टप्पा सुरू होणार नाही का ? या अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही आणि त्यावर विचारही करत नाही .आपण काय पाहत आहोत? सहानुभूती बाळगणारे ,प्रतिक्रिया देणारे ,मानवी मन नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास तयार आहे का ? याचे उत्तर मागत आहे, त्यात प्रयत्नपूर्वक यश येऊ शकते.
या आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या लोकांना मदत होऊ शकेल असे निर्णय घेण्याची ही वेळ आली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे पण त्यांना आपण सर्वसामान्य माणसाने जास्तीत जास्त पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारा निधी आणि राष्ट्रीय आरोग्य सेवा यंत्रणेची गरज पूर्ण केली पाहिजे .आहेत त्या डॉक्टरांवर कामाचा बोजा आहे म्हणून डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी मेडिकल कॉलेज ची संख्या भविष्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व सुरक्षा उपकरणे यांची सांगड घातली पाहिजे. आरोग्य सेवा व पर्यावरण रक्षण या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे .उद्योग व्यवसाय वाचवणे ,आणि नोकऱ्या वाचवणे ,कर कपात करणे ,बँकांकडून सर्वसामान्यांना कर्जाची सहज उपलब्धता मिळवून देणे ,ज्येष्ठांची बचत वाढवणे ,पेन्शन वाढवणे गरज आहे.
यापुढील काळात आपल्या आयुष्याचे नवीन नायक म्हणजे पोलीस,डॉक्टर ,वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी,बँक ऑफिसर्स, प्रशासकीय यंत्रणा आणि इतर ज्यांनी जॉब सुरू ठेवला आहे ,हे असे सर्व आपल्या आयुष्याचे नायक असतील .त्यांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त महत्व देणे सहाजिकच आहे,अशी आपण आशा करू शकतो. जेव्हा या आजारावर मात करण्यासाठी लस उपलब्ध होईल , आपण विषाणू वर मात करू तेव्हा आपले आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतंत्र असू .पण त्यावेळी सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत . उदाहरणार्थ जसे आपण मास्क वापरणे सुरू ठेवू शकतो .या काळात आपण स्वतः धडा घेतला आहे, तो नेहमीच आपल्या स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.
भावी काळात सर्वांमध्ये बदल होतील आणि हे बदल सर्व जगात दिसून येतील . कारण ही घटना प्रत्येकाचे आयुष्य बदलणारी आहे. आपले जीवन बदलण्याच्या विषाणूच्या क्षमतेमुळे संपूर्ण जग भारावून गेले आहे .यापुढे आयुष्य कधीच एकसारखे राहणार नाही, अशी एक तीव्र भावना निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक कल्पना मनात येत असतील . त्यापैकी आपल्या आयुष्याची गती मंद करून ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे महत्व लोकांना वाटू लागेल ,अनावश्यक गोष्टींचा वापर कसा टाळता येईल? याकडे प्रत्येकाचा कटाक्ष राहील. तसेच आवश्यक गोष्टी किती मर्यादित आहेत, याची सर्वांची जाणीव होईल. कोरोना महामारी नंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे आहेत. आजवर ज्या गोष्टींना आपण महत्त्व दिले नाही, त्या गोष्टी आपल्यासाठी किती गरजेच्या होत्या हे कळले. लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, मृत्युसमयी अंतिम संस्कार, वास्तुशांती, सामाजिक सभा, स्नेहसंमेलने यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असायची, पण यापुढे मात्र अनावश्यक गर्दी निश्चितच कमी होईल. लोकांमध्ये हळूहळू जाणीवजागृती विकसित होईल व आरोग्य जपण्यासाठी विनाकारण गर्दी टाळण्याकडे कटाक्ष राहील. प्रत्येक कार्यक्रमाची आचार संहिता नव्याने निर्माण होईल व ती लागू करण्याकरिता लोक स्वतःहून प्रयत्न करतील. प्रत्येक व्यक्ती ती अधिकाधिक कौशल्यपूर्ण कसे होता येईल ? यावर आपले लक्ष केंद्रित करेल. इतरांच्या मदतीशिवाय आपण आपले आयुष्य परिपूर्ण रीतीने जगण्यासाठी विविध कला जोपासण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढेल. आपण कठोर परिश्रमाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल नक्कीच करू ,यात तिळमात्र शंका नाही. वर्तमान आणि भविष्य काळात कोणतीच नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित विपत्ती आपले भवितव्य निश्चित करू शकत नाहीत. आपले वर्तमान आपण स्वतः निश्चित करू आणि आपले भवितव्य देखील आपणच निश्चित करू.भावी आयुष्यात सातत्याने पुढे पुढे वाटचाल करत राहू आणि प्रगतीपथावर धावत राहू. कोरोना रुपी संकटावर मात करू आणि सर्व विजय होऊ. यासाठी आपण कर्म आणि कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले तर निरंतर यश नक्कीच मिळणार आहे.आपण सर्व जागरूक राहिलोत तर नक्कीच निरोगी ,सुरक्षित आणि जागृत स्वयंपूर्ण भारतीय नागरिक म्हणून जगात प्रगतीपथावर राहू.
"सबका साथ,
सबका विकास,
सबका विश्वास,
सबका प्रयास."
हा विकास मंत्र घेऊन आपण शारीरिक, सामाजिक असो की जागतिक ,आर्थिक किंवा इतर कोणतीही पद्धती आली, तरीही त्याचा सामना करून आपली प्रगती करणारच आहोत. यासाठी फक्त आपण निर्भय राहून स्वयंशिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.
शालेय विद्यार्थ्यांना घरी राहून अनेक गोष्टी शाळेशिवाय व शिक्षका शिवाय शिकायला मिळतील. त्याआधारे जरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येणार नाही, तरीदेखील पालक लक्ष देतील . प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळणार नाही तरीदेखील समूह संपर्क साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा विकास करता येईल.
कोरोनाचा परिणाम मुलांच्या मानसिक अवस्थेवर पडू शकतो . आई-वडिलांना अपेक्षाही नसेल अशा पद्धतीने मुले वागू शकतात. शिक्षकांनी व पालकांनीही त्यांना समजून घ्यावे. मुलांना तणावातून बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत केली पाहिजे, अन्यथा त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. त्यासाठी मुलांना मित्र परिवाराशी जोडा, व्हिडिओ कॉल, फोन कॉल करून प्रत्यक्ष संवाद साधणे, चित्र काढणे, चित्र रंगवणे यासारखी क्रिएटिव्ह काम मुलांकडून करून घेतली पाहिजे .म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन होऊ शकतं . आत्ताची तणावपूर्ण परिस्थिती मुलांच्या विकासाच्या संधीत रूपांतरित करता येऊ शकते.विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढवणे तसेच ज्ञानासाठी नवीन रस्ते शोधणे आणि स्वतःला एका वेगळ्या भविष्याच्या तयारीसाठी सज्ज करणे यासाठी हा वेळ फायदेशीर ठरू शकतो. वाचन करणे ही अत्यंत चांगली सवय आहे. आपल्या आवडीचे विषय आवडते लेखक यांच्या पलीकडे ही हि नवीन पुस्तके वाचून ज्ञानात भर टाकू शकतात. यासाठी डिजिटल लायब्ररी जॉईन करू शकतात यासाठी शिक्षकांनी व पालकांनी विविध मार्ग अवलंबले पाहिजेत.
शिक्षकांनी सर्व मुलांपर्यंत ऑनलाईन पोहोचणे आपल्याकडे तरी तूर्तास शक्य नाही.सध्याचा काळ हा सुट्ट्यांचा काळ आहे त्यामुळे मुलांना अनेक अनौपचारिक गोष्टी शिकण्यास भरपूर वेळ आहे आणि ते गोष्टी शिकत आहेत.पण काही दिवसांनी आपणास मुलांपर्यंत कसे पोहोचता येईल हे बघावेच लागेल . सर्व स्तरावरील मुलांचा विचार करून काही ठोस उपाययोजना कराव्याच लागतील.ऑनलाइन शिक्षणाचा सध्या सुळसुळाट झाला असला तरी ते एक साधन होऊ शकते पण पर्याय निश्चितच नाही.त्याद्वारे सर्व मुलांपर्यंत पोहोचता येणे तूर्तास तरी शक्य नाही .कारण वर्गातील प्रत्येक मूल वेगळे असते त्याला त्याच्या पद्धतीने, त्याच्या गतीने शिकवावे लागते आणि ते ऑनलाईन पद्धतीत शक्य होत नाही. अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना तोंड देऊन त्यावर उपायही काढणे अत्यावश्यक झाले आहे
ऑनलाईन मुळे त्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येते ,ही प्रक्रिया एकतर्फी होते. त्यामुळे मुलांना रटाळवाणी सुद्धा होऊ शकते. मुले एका पद्धतीने कधीच शिकू शकत नाहीत. म्हणून सर्व बाबींचा विचार करून शिक्षणाचे धोरण आखणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र भयावह वातावरण आहे. उप जिविका हाच मोठा प्रश्न जनतेसमोर आहे.यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सर्व मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना कंबर कसून काम करावे लागणार आहे .तरच शिक्षण तळागळातील मुलांपर्यंत नेणे शक्य होईल.
अनेक शाळातील पालकांचा व्हाट्सअप ग्रुप शिक्षकांनी बनवला आहे व तिथे काही मुलांसोबत शैक्षणिक शिदोरीची देवाणघेवाण सुरू आहे .पण याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण शाळेतील 30 ते 50 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत.काही पालक फोन शेतात घेऊन जातात आणि घरी उशीरा येतात त्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही. तर काही पालक मुलांना जवळ फोन देण्यास घाबरतात ,कारण त्यांचा स्क्रीन टाईम वाढत आहे. शिवाय मुलांना आवश्यक गोष्टींकडे वळतील ही भीती त्यांना आहे. त्यांचा आरोग्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. काही पालकांकडे फोन आहेत पण रिचार्ज नाही .तर काही पालकांना स्मार्टफोन केवळ मनोरंजनासाठी असतात, अशा कल्पनेने साधाच फोन ते वापरतात .त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत फक्त फोनच्या माध्यमातून अशक्यच वाटतं.
आज आपण लॉकडाऊन मध्ये विविध प्रकारचे जीवन शिक्षण देखील देऊ शकतो. ही जबाबदारी फक्त शिक्षकांची नाही.या काळात सगळ्यात जास्त वेळ विद्यार्थी हा त्यांच्या पालकांकडे आहे. पालकांनी मुलांना जास्तीत जास्त जीवन शिक्षण कसे देता येईल ,याचा विचार करावा.जीवन जगण्यासाठी घरातील छोट्या छोट्या गोष्टी जसं घर साफ करणं ,भाजी निवडणं ,गहू निवडणं या प्रकारचे शिक्षण कृतीतून दिले पाहिजे. अशी संधी आपल्याला पुन्हा परत मिळणारही नाही, हे सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे .कारण जीवन शिक्षण हा देखील शिक्षण पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा पाया आहे या दरम्यान आपण संस्कार मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना ऑनलाईनच नव्हे तर ऑफलाईन मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे येणारी परिस्थिती तीन ते चार महिन्यात बदलेल असे आता तरी वाटत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पालक , विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्व संपर्कात असणे आवश्यक आहे.
येणारा काळ हा फार आव्हानात्मक असणार आहे ,कारण मुलांची मानसिकता या कोरोना रुपी राक्षसाने एकाप्रकारे खच्ची केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाची सक्षम अशी तजवीज आजच करून ठेवावी लागणार आहे.मुलांना मानसिक दृष्ट्या खचू न देता सक्षम बनवणं गरजेचं झाले आहे आणि त्यासाठी आनंददायी शिक्षण देणे पुढच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
उद्याची काळजी न करता व भविष्यात काय होईल याचे भय न बाळगता ,आज आपण फक्त आपले आरोग्याचे रक्षण करणे हाच आपला धर्म आहे. यासाठी एक दाखला देते,कुरुक्षेत्रावर अर्जुनाने युद्ध न लढण्याचा पवित्रा घेतला तेव्हा श्रीकृष्णाने त्यास समजावले होते,"आता काहीही पर्याय नाही, मुद्दा युद्धाचा नाही ,तर धर्मरक्षणाचा आहे."याप्रमाणे या क्षणी आपला एकच धर्म आहे ,तो म्हणजे आरोग्यरक्षण.
म्हणून येणारा कालखंड ही आपली परीक्षा घेणारा असला तरी आपण ती परीक्षा निश्चितपणे सर्वांच्या एकत्रित सहकार्याने पार पाडू या आणि कोरोनारुपी या संकटाला आपण आपल्या कौशल्याने शिक्षण घेऊन जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण निर्मिती करून भावी पिढी घडवू या..
संदर्भसूची
१.गुरुचरण दास
स्तंभलेखक. लॉकडाऊन: कुणाला वाचवायचे कुणास नाही यावर अवलंबून.... लेख दिव्य मराठी गुरुवार 30 एप्रिल 2020.
पेज नंबर २
२. आशुतोष शेवाळकर
कोरणा च्या निमित्ताने हे संकट की त्याची सुरुवात...... लेख गुरुवार 30 एप्रिल 2020.
पेज नंबर ४
३. मारिया मेजेटी
वरिष्ठ पत्रकार ( मिलान) इटली
गतचा चांगल्या गोष्टींसह नव्या देशाला आकार देण्याची संधी..... लेख दिव्य मराठी सोमवार 4 मे 2020 पेज नंबर २.
४. दीप्ती राऊत नाशिक
कोरोना युद्ध डॉक्टर आत दुजाभाव काम जोखिम तीच मानधनात फरक... लेख शुक्रवार 8 मे 2020
पेज नंबर ४.
श्रीमती मेघा अनिल पाटील .
उपशिक्षिका.
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com