Sunday, 27 September 2020

लेख

      " लॉकडाऊन मध्ये मी केलेले काम "
       लॉकडाऊन काळात मी खरे जीवन जगले. दैनंदिन जीवनात नुसतीच धावपळ अन् दगदग यामुळे स्वतःकडे, घराकडे,स्वतःच्या अभिरुचींकडे ,मुलांकडे , कुटुंबाच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष होतं ,याची जाणीव प्रकर्षाने झाली.
    नवीन गोष्टींचा शोध घेण्याची क्षमता माणसात पूर्वीपासून चालत आलेली आहे. माणसाने शेतीचा शोध लावला,चाकाचा शोध लावला आणि त्यातून स्वतःचा, कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा विकास केला. नवीन गोष्टींच्या शोधामुळे माणसाला त्याचे जगणे आनंदी, सोपे कमी कष्टाचे करता आले. विविध आजारांवर उपचार करता आले. नवीन गोष्टींचा शोध घेण्याची सवय ही आपल्याला कायम फायद्याची ठरत आलेली आहे. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जसे कष्ट करावे लागतात त्याचप्रमाणे नवीन गोष्टी शिकल्याने, त्यांचा शोध घेतल्याने आपल्याला आपला विकास करता येतो. नवीन माहिती मिळवल्याने आपण या काळात चांगल्या प्रकारे जगू शकतो.आपण मोबाईल वापरायला शिकलो तर आपली बरीच कामे जागेवरून होतात. अनेक हेलपाटे वाचतात. नवीन गोष्टींमुळे आनंद सुद्धा होतो. शिकण्याची पण मजा असते. नवीन गोष्टी शिकायची मनाची तयारी हवी. त्यामुळे नवनवीन खूप काही समजते, करता येते. नवीन गोष्टींची माहिती घेतल्यामुळे आपल्याला स्वतःचा विचार करायची सवय लागते. नव्या तरुण पिढीशी चांगले जमू शकते. उगीचच वयस्कर झाल्यासारखे वाटतात नव्या उमेदीने जगायला उत्साह वाढतो. 
       लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे उदाहरण याबाबतीत आपल्याला लक्षात घेता येईल.टिळक जेव्हा मंडाले येथे सहा वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांच्या वयाची  पन्नाशी उलटली होती. तरीही त्यांनी व्याकरणाची पुस्तके मागवून त्यावरून जर्मन व फ्रेंच भाषांवर अभ्यास करून प्राविण्य मिळवले होते, यालाच म्हणतात नवीन गोष्टींचा शोध घेणे व त्यातून बोध घेणे. यातून माणूस ज्ञानी तर होतोच पण त्याचबरोबर विचारही व्यापक होतात म्हणून नावीन्याचा शोध घेणे ही आयुष्य सुंदर करणारी गोष्ट आहे.
         आपण विचार कसा करतो, वाचन कसं करतो, त्यावर मनन आणि चिंतन काय करतो यावर आपले आयुष्य अवलंबून असतं. आपण जर उदात्त आणि सात्विक विचार बाळगत असू तर आपला चेहरा हे सात्विक दिसतो आणि मन देखील प्रसन्न राहते. जर आपल्याला आयुष्यात चांगले जीवन जगायचे असेल, आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा विचार करणे व त्यावर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी सर्वप्रथम मी माझी दिनचर्या नियमित ठेवली . दररोज सकाळी माझ्या कुटुंबा सोबत सामूहिक प्रार्थना केली. कारण ज्या-ज्यावेळी समाजावर संकट कोसळले त्या-त्यावेळी सामुदायिक प्रार्थना करूनच  ईश्वराला जागविण्याची व समाजाची विस्कटलेली घडी दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त ठरते असे अनेक दाखले आपल्या प्राचीन ग्रंथात दिले आहेत. त्यानुसार
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सांगतो निरामय: l
सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नयात l
  या जगातील सर्व लोक सुखी राहोत, सर्व आरोग्यमान होवोत व सर्वांना आपल्या कल्याणाचे मार्ग दिसोत,जाणता येवोत, कोणी कोणत्याही प्रकारे दुःखी न होवो. अशी प्रार्थना करून आमची सारी दिनचर्या सभ्यतेने, समतेने, निर्मलतेने, शांतीने आणि निष्कामतेने व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिली. माझा थोरला मुलगा  न्यूयार्क येथे उच्च शिक्षणासाठी असल्यामुळे त्याची काळजी वाटत होती म्हणून प्रार्थनेने सकारात्मक ऊर्जा मिळाली. त्याच्याशी व्हिडिओ कॅमेर्‍याने संपर्क साधून पॉझिटिव्ह दृष्टीकोण ठेवण्यासाठी सतत प्रेरणा दिली. समतोल आहार ,व्यायाम आणि वाचनाची जोड देऊन शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला.
       काय होतं नेमकं नेहमीपेक्षा वेगळा विचार केल्यावर? तर आपल्या समस्या, आपले प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो. लॉक डाउन काळात गृहिणी , एक शिक्षिका ,आई ,पत्नी, लेक म्हणून अनेक स हैमस्या उद्भवल्या. परंतु जीवनाकडे सकारात्मक पणे पाहिले तर आपण आपल्या समस्या, प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. आपण स्वावलंबनासाठी प्रेरित होतो. अनेक कामे आपण एकट्याने करू शकतो. आपला जीवन विषयक दृष्टिकोन व्यापक होतो. इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच इतरांना मदत करायला पुढे धावतो. एखाद्या प्रश्नाकडे विविधांगांनी बघता येणे यामुळे सहज शक्य होते. मन आनंदी राहते. आपल्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये ही बदल होण्यास मदत होते.
       आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला खूप काम करावे लागते, या सर्व धावपळीत मानसिक ताण तणाव आलाही आपण सामोरे जात असतो. अशावेळी आपण चिंता करत बसण्यापेक्षा जर दररोजच्या पेक्षा वेगळा विचार केला तर आपणहून आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सहज शक्य होते. याचबरोबर जीवनात आपण अनेक गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो. या काळात मी अनेक गोष्टी नव्याने शिकली. काही गोष्टी मी पहिल्यांदाच केल्यात. त्यात मुलाच्या व माझ्या यजमानांची  केसांची कटींग मी पहिल्यांदाच घरी केली व ती अत्यंत उत्तम प्रकारे केली याचे प्रमाणपत्रही ही त्या दोघांच्या पसंतीतून मिळविले. कारण लॉकडाऊन काळात केसांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती आणि सलून बंद होते .त्यामुळे मला ती एक चांगली संधी प्राप्त झाली. मला माझ्यातील एका नव्या कौशल्याचा शोध लागला. एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. एप्रिल व मे महिना प्रचंड ऊन असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चकल्या, वेफर्स, कुरडाया, शेवया,पापड ,मसाले व इतर वाळवण देखील मी स्वतः तयार करून वर्षभर पुरेल इतका साठा करून ठेवण्यात यशस्वी झाली. जे यापूर्वी मी कधीही केले नव्हते. याकामी मला आई, माझा मुलगा व माझे यजमान यांचे मोलाचे सहकार्य लाभले, यातून मला अविस्मरणीय आनंद मिळाला. तसेच गच्चीवरील कुंड्यांमध्ये व रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, डबे यांचा वापर करून परसबागेत चाफा, बोगनवेल, गुलाब, जास्वंद , पानफुटी अनेक नवीन रोपांची लागवड केली. उपलब्ध जागेतच मेथी,कोथंबीर व इतर पालेभाज्यांची लागवड केली. जुन्या कपड्यांपासून 500 हून अधिक पिशव्या प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून तयार केल्यात. घरीच उपलब्ध असलेल्या कापडांपासून मास्क तयार करून वाट लेत.तसेच रोज माझ्या एका सहकारी, स्नेही, नातेवाईक, मित्रमंडळी यापैकी एका सोबत फोन ने संपर्क साधला .वर्तमान परिस्थिती बद्दल सकारात्मक चर्चा केली . तसेच गुजरात मधून नवापूर मार्गे जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी दररोज वीस पोळ्यांची मदत मी दहा दिवस नियमितपणे आमच्या नवापूर येथील अस्तित्व या स्वयंसेवी संघटनेला केली.
        इयत्ता बारावी चा अभ्यासक्रम २०-२१ या शैक्षणिक वर्षात बदलला  म्हणून नवीन पुस्तक आल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोट्स तयार केल्यात.तसेच  Mrs.Megha Patil हे युट्युब चॅनेल सुरू करून आतापर्यंत दहा ते बारा युट्युब बनवून त्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केल्यात. अल्प कालावधीतच अनेक सबस्क्राईबरही मिळालेत. तसेच मी गेल्या चार वर्षांपासून  Meghapatils.blog.spot या माझ्या ब्लॉग वर लिहीणे सुरु केले आहे,त्यात खासकरून विद्यार्थ्यांसाठी कोरोना विषयी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव जागृती विषयक माहिती लिहिली. यासाठी मी इंटरनेट समूह संपर्काची माध्यमे व सोशल मीडिया यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. तसेच दररोज काहीतरी कविता, लेख अशा प्रकारचे साहित्य लिहिण्याचा संकल्प केला .
      ना सा येवतीकर या  उपक्रमशील शिक्षकांनी दररोज एक विषय देऊन स्पर्धा घेऊन ब्लॉग वाचण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यात मी सहभागी होऊन एका लेखात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच त्यांनी तयार केलेल्या ई बुक मध्ये माझ्या पर्यावरण हा लेख प्रसिद्ध झाला. खालील प्रमाणे मी या काळात लेखन केले व त्यास प्रसिद्धीही मिळाली.
दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत हिरकणी व व्यसनाधीनता या कवितांना ही प्रसिद्धी मिळाली . तसेच रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकात दिनांक  30 एप्रिल रोजी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा , 9 मे रोजी कष्ट आणि जीवन ,29 मे रोजीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय . शिक्षक ध्येय या डिजिटल साप्ताहिकात "असे कसे झाले "या कवितेला व  शैक्षणिक क्षेत्रातील उपाय योजना या लेखांना  प्रसिद्धी मिळाली.
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नवापूर आयोजित वेबिनार सीरिजमध्ये हे दिनांक 2 मे ते 16 मे पर्यंत सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पतिशास्त्र परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन केले. तसेच ऑनलाईन अनेक अभ्यासक्रमांची संधी चालून आली तिचाही मी तितकाच तत्परतेने उपयोग करून घेतला. कारण शिक्षणासाठी कोणाचा काळ हा बदलाचा काळ आहे.आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण एक शिक्षकी व्यवस्थेपासून पुढे जाऊन "one on one learning" कडे अग्रेसर होणार आहोत. कारण लोक डाऊन मुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा बदल घडला आहे शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व मलाही कळले. बहुतेक सर्वच विद्यार्थी नेहमीच ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीचा स्वीकार करण्यास तयार असतात ,म्हणून शिक्षक या नात्याने मी देखील ऑनलाइन शिक्षणाकडे स्मार्ट डिवाइस आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे ज्ञानाची शिदोरी संग्रहित करू शकली. तंत्रज्ञान आणि शिक्षकांच्या मदतीने कठीण आहून कठीण वाटणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज आणि परिणामकारक पद्धतीने समजतात. इतकेच नव्हे तर ऑनलाईन लर्निंग मध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात शिक्षकाची भूमिका वाढते हे देखील लक्षात आले विषयातील संकल्पना अधिक रंजक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी शिक्षक म्हणून मी काय केले पाहिजे? हे मला कळून चुकले. प्रत्येक आव्हान एक संधी देत असते. लोक डाऊन चा काळ हा शिक्षणव्यवस्थेतील बदलाचा टप्पा आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतींचा विस्तार होत असतानाच नव्या पिढीला डिजिटल स्क्रीन त्यांच्या नव्या जगाची जोडत आहे. अध्ययनाच्या या नव्या मॉडेलचा अधिकाधिक वापर व वाढ होत राहील. यापूर्वीच्या काळात एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना शिकवीत असत परंतु आता पुढे जाऊन आपण वन ऑन वन लर्निंग या अध्ययन सूत्रांकडे वळलो आहोत याची कल्पनाही आली. म्हणून ऑनलाइन शिक्षणाकडे शिक्षकांपासून पालकांपर्यंत विद्यार्थ्यांनासाठी सर्वांनीच जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र ऑनलाइन कडे वळत आहे ही सुखद घटना म्हणावी. अर्थात हे बदल काळाच्या गरजेनुसार करण्यात येत असून दुसरा पर्याय नसल्यामुळे स्विकारला जातोय. म्हणून मी क्षणाक्षणाला कणाकणाने ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला.
     या काळात आंतरिक जगाकडे पाहण्याची विशिष्ट व अचानक संधी मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच हलक्या स्वरात का होईना अंतर्मनातील आवाज ऐकायला मिळाला. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या गोष्टी आहेत तशाच स्वीकारण्यात तर जीवन जगणे अगदी सोपे होते. आत्मनिर्भर होणे म्हणजे काय ?याची प्रचिती आली. जीवनात आपण अनेक गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो यासाठी एक उदाहरण पाहू.
       बर्नर हा तरुण एका फोटोग्राफर कडे काम करीत होता. त्याच्या स्टुडिओत एक गिऱ्हाईक  एकदा एक खगोल शास्त्रावरील पुस्तक विसरला. हे पुस्तक बर्नर घरी घेऊन गेला आणि रात्रभर जागून त्याने ते पुस्तक वाचून काढले त्या पुस्तकातून भरला स्फूर्ती मिळाली आणि त्याने चार इंची दुर्बिण खरेदी केली .त्यात चार इंची दुर्बिणीने तो आकाश निरीक्षण करू लागला. आकाश निरीक्षणांचा क्रम त्याने रोज रात्री चालू ठेवला. त्यामुळे त्याचा अभ्यास वाढत गेला. त्याला खगोलशास्त्रातील थक्क करणारी माहिती मिळाल्यावर त्याच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. आता त्याने थोडी मोठी दुर्बीण खरेदी केली आणि आकाशाचा त्याचा अभ्यास रोज वाढू लागला. लवकरच त्याच्या मेहनतीला फळ मिळाले, त्याला समजलेली आकाशातील अनेक रहस्ये त्याने जगासमोर मांडली. हे सर्व यश बर्नर ला तेथे विसरलेल्या पुस्तका मुळेच लाभले . एका पुस्तकाच्या रूपाने त्याच्यासमोर संधी चालून आली होती, त्याचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला .खरोखर त्या वेळी त्याने वेगळा विचार केला नसता तर तो खगोल शास्त्राचा अभ्यासक होऊच शकला नसता. परंतु त्याने नेहमीपेक्षा वेगळा विचार केला आणि आयुष्यात यशस्वी झाला .आपल्यालाही जर मिळवायचे असेल तर अनेक मार्ग खुले असतात फक्त त्या मार्गांचा शोध घेण्यासाठी आपण नेहमीपेक्षा वेगळा विचार करणे जास्त महत्त्वाचा आहे हे मला या लॉकडाऊन काळात कळून चुकलं.
   
       श्रीमती मेघा अनिल पाटील
              उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com

   संदर्भ सूची

खालील माझे लेख व कविता प्रसिद्ध झालेत.

22 एप्रिल_ जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल_ जागतिक पुस्तक दिन
28 एप्रिल _शाळेतील गमती जमती
29 एप्रिल _लोभ किंवा लालच
1 मे_कष्ट आणि जीवन
3 मे_आई
5 मे _जैवविविधता
8 मे_ रक्तदान
10 मे _जन्म आणि मृत्यू
20 मे_मुलींचे शिक्षण
  3 जून _पर्यावरण ....... श्रीमती मेघा अनिल पाटील.

http://meghapatils.blogspot.com/2020/06/blog-post_6.html

दिव्य मराठी पेपर- मधुरिमा पुरवणी हिरकणी व व्यसनाधीनता या कविता .
१)रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकात  दिनांक  30 एप्रिल रोजी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ,
२)9 मे रोजी कष्ट आणि जीवन ,
३)29 मे रोजी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय 
४)शिक्षक ध्येय या डिजिटल साप्ताहिकात "असे कसे झाले "ही कविता.
५)तंत्रज्ञानाधारित अध्ययनात आपल्या शिक्षणाचे भवितव्य.... बैजू रविंद्रण...Byju's app  चे संस्थापक आणि सीईओ दिव्य मराठी 10 जून 2020 पेज नंबर 2.
६)पॉझिटिव्ह थिंकिंग. .. पद्माकर नसते सोनाली प्रकाशन पेज नंबर 66 

Friday, 18 September 2020

कोरोना मुळे जनजीवनावर होणारा परिणाम

"लॉकडाऊनमुळे बदललेले जग"

       मागील चार महिन्यापासून आपला देश  लॉकडाऊन चा अनुभव घेत आहे .अनेकदा मनात डोकावून बघितले तर असं वाटतं की जगभरात विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निसर्गाचे पुनर्स्थापन होते आहे. लॉकडाऊननंतर काय होणार ही खरोखर मोठी आणि गंभीर समस्या आहे. महामारी एका रात्रीतून संपणार नाही किंवा टाळ्या वाजवून आणि दिवे पेटवून तिची तीव्रता कमी होणार नाही. तसेच विषाणू ग्रस्त शहरे सहजपणे शांत होणार नाहीत. खेडी आणि लहान शहरात स्थलांतरित मजुरांची गर्दी झाली आहे. ते रिकाम्या खिशाने घरी परतले आहेत. ते आगामी काही महिन्यात उदरनिर्वाह कसा करतील? शेतकरी बाजारात आपली पिके कसे विकतील  ?ट्रक वाले व वाहतुकीची साधने कुठे आहेत ?गरजेचे पण महाग साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा कुठे आहे ?बहुतांशी लहान व्यवसाय बंद आहेत. मोठे व्यवसायही ही ऑक्सिजनवर आहेत. लाखो लोक बेरोजगार आहेत . शहरांमध्ये नोकऱ्या सुरू झाल्या तरी हे लोक विषाणू संक्रमित शहरात परत जातील का ?त्यापैकी बहुतांश शहरे अधिकृतरित्या करोना मुक्त आहेत का ?  हे लोक परतले तर त्यामुळे विषाणू हल्ल्याचा पुढील टप्पा सुरू होणार नाही का ? या अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही आणि त्यावर विचारही करत नाही .आपण काय पाहत आहोत? सहानुभूती बाळगणारे ,प्रतिक्रिया देणारे ,मानवी मन नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास तयार आहे का ? याचे उत्तर मागत आहे, त्यात प्रयत्नपूर्वक यश येऊ शकते.
        या आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या लोकांना मदत होऊ शकेल असे निर्णय घेण्याची ही वेळ आली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे पण त्यांना आपण सर्वसामान्य माणसाने जास्तीत जास्त पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारा निधी आणि राष्ट्रीय आरोग्य सेवा यंत्रणेची गरज पूर्ण केली पाहिजे .आहेत त्या डॉक्टरांवर कामाचा बोजा आहे म्हणून डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी मेडिकल कॉलेज ची संख्या भविष्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व सुरक्षा उपकरणे यांची सांगड घातली पाहिजे. आरोग्य सेवा व पर्यावरण रक्षण या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे .उद्योग व्यवसाय वाचवणे ,आणि  नोकऱ्या वाचवणे ,कर कपात करणे ,बँकांकडून सर्वसामान्यांना कर्जाची सहज उपलब्धता मिळवून देणे ,ज्येष्ठांची बचत वाढवणे ,पेन्शन वाढवणे गरज आहे.
       यापुढील काळात आपल्या आयुष्याचे नवीन नायक म्हणजे पोलीस,डॉक्टर ,वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी,बँक ऑफिसर्स, प्रशासकीय यंत्रणा आणि इतर ज्यांनी जॉब सुरू ठेवला आहे ,हे असे सर्व आपल्या आयुष्याचे नायक असतील .त्यांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त महत्व देणे सहाजिकच आहे,अशी आपण आशा करू शकतो. जेव्हा या आजारावर मात करण्यासाठी लस उपलब्ध होईल , आपण  विषाणू वर मात करू तेव्हा आपले आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतंत्र असू .पण त्यावेळी सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत . उदाहरणार्थ  जसे आपण मास्क वापरणे सुरू ठेवू शकतो .या काळात आपण स्वतः धडा घेतला आहे, तो नेहमीच आपल्या स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.
         भावी काळात सर्वांमध्ये बदल होतील आणि हे बदल सर्व जगात दिसून येतील . कारण ही घटना प्रत्येकाचे आयुष्य बदलणारी आहे. आपले जीवन बदलण्याच्या विषाणूच्या क्षमतेमुळे संपूर्ण जग भारावून गेले आहे .यापुढे आयुष्य कधीच एकसारखे राहणार नाही, अशी एक तीव्र भावना निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक कल्पना मनात येत असतील . त्यापैकी आपल्या आयुष्याची गती मंद करून ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे महत्व लोकांना वाटू लागेल ,अनावश्यक गोष्टींचा वापर कसा टाळता येईल? याकडे प्रत्येकाचा कटाक्ष राहील. तसेच आवश्यक गोष्टी किती मर्यादित आहेत, याची सर्वांची जाणीव होईल. कोरोना महामारी नंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे आहेत. आजवर ज्या गोष्टींना आपण महत्त्व दिले नाही, त्या गोष्टी आपल्यासाठी किती गरजेच्या होत्या हे कळले. लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, मृत्युसमयी अंतिम संस्कार, वास्तुशांती, सामाजिक सभा, स्नेहसंमेलने यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असायची, पण यापुढे मात्र अनावश्यक गर्दी निश्चितच कमी होईल. लोकांमध्ये हळूहळू जाणीवजागृती विकसित होईल व आरोग्य जपण्यासाठी विनाकारण गर्दी टाळण्याकडे कटाक्ष राहील. प्रत्येक कार्यक्रमाची आचार संहिता नव्याने निर्माण होईल व ती लागू करण्याकरिता लोक स्वतःहून प्रयत्न करतील. प्रत्येक व्यक्ती ती अधिकाधिक कौशल्यपूर्ण कसे होता येईल ? यावर आपले लक्ष केंद्रित करेल. इतरांच्या मदतीशिवाय आपण आपले आयुष्य परिपूर्ण रीतीने जगण्यासाठी विविध कला जोपासण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढेल. आपण कठोर परिश्रमाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल नक्कीच करू ,यात तिळमात्र शंका नाही. वर्तमान आणि भविष्य काळात कोणतीच नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित विपत्ती आपले भवितव्य निश्चित करू शकत नाहीत. आपले वर्तमान आपण स्वतः निश्चित करू आणि आपले भवितव्य देखील आपणच निश्चित करू.भावी आयुष्यात सातत्याने पुढे पुढे वाटचाल करत राहू आणि प्रगतीपथावर धावत राहू. कोरोना रुपी संकटावर मात करू आणि सर्व विजय होऊ. यासाठी आपण कर्म आणि कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले तर निरंतर यश नक्कीच मिळणार आहे.आपण सर्व जागरूक राहिलोत तर नक्कीच निरोगी ,सुरक्षित आणि जागृत स्वयंपूर्ण भारतीय नागरिक म्हणून जगात प्रगतीपथावर राहू.
     "सबका साथ,
          सबका विकास,
              सबका विश्वास,
                 सबका प्रयास."
       हा विकास मंत्र घेऊन आपण शारीरिक, सामाजिक असो की जागतिक ,आर्थिक किंवा इतर कोणतीही पद्धती आली, तरीही त्याचा सामना करून आपली प्रगती  करणारच आहोत. यासाठी फक्त आपण निर्भय राहून स्वयंशिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.
       शालेय विद्यार्थ्यांना घरी राहून अनेक गोष्टी शाळेशिवाय व शिक्षका शिवाय शिकायला मिळतील. त्याआधारे जरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येणार नाही, तरीदेखील पालक लक्ष देतील . प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळणार नाही तरीदेखील समूह संपर्क साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा विकास करता येईल.
               कोरोनाचा परिणाम मुलांच्या मानसिक अवस्थेवर पडू शकतो . आई-वडिलांना अपेक्षाही नसेल अशा पद्धतीने मुले वागू शकतात. शिक्षकांनी व पालकांनीही त्यांना समजून घ्यावे. मुलांना तणावातून बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत केली पाहिजे, अन्यथा त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. त्यासाठी मुलांना मित्र परिवाराशी जोडा, व्हिडिओ कॉल, फोन कॉल करून प्रत्यक्ष संवाद साधणे, चित्र काढणे, चित्र रंगवणे यासारखी क्रिएटिव्ह काम मुलांकडून करून घेतली पाहिजे .म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन होऊ शकतं . आत्ताची तणावपूर्ण परिस्थिती मुलांच्या विकासाच्या संधीत रूपांतरित करता येऊ शकते.विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढवणे तसेच ज्ञानासाठी नवीन रस्ते शोधणे आणि स्वतःला एका वेगळ्या भविष्याच्या तयारीसाठी सज्ज करणे यासाठी हा वेळ फायदेशीर ठरू शकतो. वाचन करणे ही अत्यंत चांगली सवय आहे. आपल्या आवडीचे विषय आवडते लेखक यांच्या पलीकडे ही हि नवीन पुस्तके वाचून ज्ञानात भर टाकू शकतात. यासाठी डिजिटल लायब्ररी जॉईन करू शकतात यासाठी शिक्षकांनी व पालकांनी विविध मार्ग अवलंबले पाहिजेत.
     शिक्षकांनी सर्व मुलांपर्यंत ऑनलाईन पोहोचणे आपल्याकडे तरी तूर्तास शक्य नाही.सध्याचा काळ हा सुट्ट्यांचा काळ आहे त्यामुळे मुलांना अनेक अनौपचारिक गोष्टी शिकण्यास भरपूर वेळ आहे आणि ते  गोष्टी शिकत आहेत.पण काही दिवसांनी आपणास मुलांपर्यंत कसे पोहोचता येईल हे बघावेच लागेल . सर्व स्तरावरील मुलांचा विचार करून काही ठोस उपाययोजना कराव्याच लागतील.ऑनलाइन शिक्षणाचा सध्या सुळसुळाट झाला असला तरी ते एक साधन होऊ शकते पण पर्याय निश्चितच नाही.त्याद्वारे सर्व मुलांपर्यंत पोहोचता येणे तूर्तास तरी शक्य नाही .कारण वर्गातील प्रत्येक मूल वेगळे असते त्याला त्याच्या पद्धतीने, त्याच्या गतीने शिकवावे लागते आणि ते ऑनलाईन पद्धतीत शक्य होत नाही. अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना तोंड देऊन त्यावर उपायही काढणे अत्यावश्यक झाले आहे 
       ऑनलाईन मुळे त्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येते ,ही प्रक्रिया एकतर्फी होते. त्यामुळे मुलांना रटाळवाणी सुद्धा होऊ शकते. मुले एका पद्धतीने कधीच शिकू शकत नाहीत. म्हणून सर्व बाबींचा विचार करून शिक्षणाचे धोरण आखणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र भयावह वातावरण आहे. उप जिविका हाच मोठा प्रश्न जनतेसमोर आहे.यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सर्व मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना कंबर कसून काम करावे लागणार आहे .तरच शिक्षण तळागळातील मुलांपर्यंत नेणे शक्य होईल.
अनेक शाळातील पालकांचा व्हाट्सअप ग्रुप शिक्षकांनी बनवला आहे व तिथे काही मुलांसोबत शैक्षणिक शिदोरीची देवाणघेवाण सुरू आहे  .पण याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण शाळेतील  30 ते 50 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत.काही पालक फोन शेतात घेऊन जातात आणि घरी उशीरा येतात त्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही. तर काही पालक मुलांना जवळ फोन देण्यास घाबरतात ,कारण त्यांचा स्क्रीन टाईम वाढत आहे. शिवाय मुलांना आवश्यक गोष्टींकडे वळतील ही भीती त्यांना आहे. त्यांचा आरोग्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. काही पालकांकडे फोन आहेत पण रिचार्ज नाही .तर काही पालकांना स्मार्टफोन केवळ मनोरंजनासाठी असतात, अशा कल्पनेने साधाच फोन ते वापरतात .त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत फक्त फोनच्या माध्यमातून  अशक्यच वाटतं.
     आज आपण लॉकडाऊन मध्ये विविध प्रकारचे जीवन शिक्षण देखील देऊ शकतो. ही जबाबदारी फक्त शिक्षकांची नाही.या काळात सगळ्यात जास्त वेळ विद्यार्थी हा त्यांच्या पालकांकडे आहे. पालकांनी मुलांना जास्तीत जास्त जीवन शिक्षण कसे देता येईल ,याचा विचार करावा.जीवन जगण्यासाठी घरातील छोट्या छोट्या गोष्टी जसं घर साफ करणं ,भाजी निवडणं ,गहू निवडणं या प्रकारचे शिक्षण कृतीतून दिले पाहिजे. अशी संधी आपल्याला पुन्हा परत मिळणारही नाही, हे सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे .कारण जीवन शिक्षण हा देखील शिक्षण पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा पाया आहे  या दरम्यान आपण संस्कार मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना ऑनलाईनच नव्हे तर ऑफलाईन मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे  येणारी परिस्थिती तीन ते चार महिन्यात बदलेल असे आता तरी वाटत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पालक , विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्व संपर्कात असणे आवश्यक आहे.
       येणारा काळ हा फार आव्हानात्मक असणार आहे ,कारण मुलांची मानसिकता या कोरोना रुपी राक्षसाने एकाप्रकारे खच्ची केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाची सक्षम अशी तजवीज आजच करून ठेवावी लागणार आहे.मुलांना मानसिक दृष्ट्या खचू न देता सक्षम बनवणं गरजेचं झाले आहे आणि त्यासाठी आनंददायी शिक्षण देणे पुढच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
उद्याची काळजी न करता व भविष्यात काय होईल याचे भय न बाळगता ,आज आपण फक्त आपले आरोग्याचे रक्षण करणे हाच आपला धर्म आहे. यासाठी एक दाखला देते,कुरुक्षेत्रावर अर्जुनाने युद्ध न लढण्याचा पवित्रा घेतला तेव्हा श्रीकृष्णाने त्यास समजावले होते,"आता काहीही पर्याय नाही, मुद्दा युद्धाचा नाही ,तर धर्मरक्षणाचा आहे."याप्रमाणे या क्षणी आपला एकच धर्म आहे ,तो म्हणजे आरोग्यरक्षण. 
        म्हणून येणारा कालखंड ही आपली परीक्षा घेणारा असला तरी आपण ती परीक्षा निश्चितपणे सर्वांच्या एकत्रित सहकार्याने पार पाडू या आणि कोरोनारुपी या संकटाला आपण आपल्या कौशल्याने शिक्षण घेऊन जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण निर्मिती करून भावी पिढी घडवू या..

 संदर्भसूची

१.गुरुचरण दास
स्तंभलेखक.    लॉकडाऊन: कुणाला वाचवायचे कुणास नाही यावर अवलंबून.... लेख दिव्य मराठी गुरुवार 30 एप्रिल 2020.
पेज नंबर २
२. आशुतोष शेवाळकर
कोरणा च्या निमित्ताने  हे संकट की त्याची सुरुवात...... लेख गुरुवार 30 एप्रिल 2020.
पेज नंबर ४
३. मारिया मेजेटी
वरिष्ठ पत्रकार ( मिलान) इटली
गतचा चांगल्या गोष्टींसह नव्या देशाला आकार देण्याची संधी..... लेख दिव्य मराठी सोमवार 4 मे 2020 पेज नंबर २.
४. दीप्ती राऊत नाशिक
कोरोना युद्ध डॉक्टर आत दुजाभाव काम जोखिम तीच मानधनात फरक... लेख शुक्रवार 8 मे 2020
पेज नंबर ४.


     श्रीमती मेघा अनिल पाटील .
      उपशिक्षिका.
    श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email   patilmeghaa@gmail.com

Thursday, 17 September 2020

Online tests links

Online test links for 12th science students https://forms.gle/yyyhd7sV2yJtUA7Q6 link for test on Chapter number 3 Inheritance and variation.

https://forms.gle/g3i7i6Z9JHMZAnRa6 Link for online test on Chapter number 1. Reproduction in lower and higher plants.

*Biology Online test (on Chapter no. 2 - Reproduction in lower and higher animals)*
*Dear Students, Try to solve test.*
*All the best*
*Click on Link and give test*

https://forms.gle/RTro9N76mLfyW9W6A

"कोरोना आणि ऑक्सिमीटर बद्दल माहिती

"कोरोना आणि ऑक्सिमीटर" 

एव्हाना बऱ्याच लोकांपर्यत कोरोनाची लागण झाल्यास या रोगाची तीव्रता जोखण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण कामी येऊ शकतं ही माहिती पोहोचली आहे. "पल्स ऑक्सिमीटर वापरा आणि अमुक एक रिडींग असेल तर घाबरायची गरज नाही" असं नुसतंच सांगण्यापेक्षा या मशीनच्या सदंर्भातले लोकांच्या मनातले बेसिक प्रश्न सोडवले,शास्त्रीय दुष्टीकोनातून शक्य होईल तितक्या सोप्या भाषेत जर या मागचं विज्ञान उलगडून दाखवता आलं, तर नक्कीच या उपकरणाची उपयुक्तता जास्तं लोकांना समजेल आणि एका छोट्याश्या उपकरणामुळे या रोगाला न घाबरता आपण योग्य नियम पाळून, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, घाबरून न जाता आपल्या घरामध्ये राहून, योग्य वैद्यकीय उपचार घेऊन कोरोनाला घालवू शकतो हा विश्वास निर्माण होईल.. यासाठी हा लेख. 

पल्स ऑक्सिमीटर म्हणजे एक छोटंसं मशीन जे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी दाखवतं. हे इतकुसं मशीन कसं काय बुवा आपली मदत करतं? कोणतीही सुई न टोचता, फक्त या मशीनमध्ये बोट अडकवलं तर याला कसं कळतं आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण? यामागचं शास्त्रीय कारण काय आहे? आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण अमुक इतकं असणं का गरजेचं असतं?  शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि कोरोनाचा काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात. बायोमेडिकल इंजिनिअरींग शिकताना   विज्ञान आणि टेक्नॉलॉजीची यांची  सांगड घालून उपकरणं कशी बनवली जातात आणि फिजिओलॉजी शिकताना ही उपकरणं जे रिझल्ट देतात त्यांचा संबंध शरीरात काय बिघाड झाला आहे याच्याशी कसा लावायचा याचा अभ्यास केला आहे. 

कोरोनाचा आणि  शरीरातील ऑक्सिजन कमी होण्याचा संबंध आहे तरी  काय?

कोरोनाची लागणं झाल्यावर रुग्णाच्या  शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे या आजाराची  तीव्रता किती आहे याचं एक इंडिकेटर आहे. या रोगाशी प्रतिकार करण्यास जेव्हा रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी पडते तेव्हा, हा विषाणू अधिक फोफावत जातो.  ज्या लोकांमध्ये  ब्लड प्रेशर, डायेबेटीस,हृदयाचे विकार, श्वसनाचे विकार, वय जास्तं असल्याने क्षीण झालेली प्रतिकारशक्ती ही अंडरलाईंग कारणं असतात,  अशा लोकांमध्ये कोरोना झाल्यावर ARDS म्हणजे ‘अक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ होण्याची शक्यता जास्तं असते. अशा वेळी श्वास घ्यायला त्रास होणं,कोरडा  खोकला  येणं, हृदयाची धडधड वाढणं ही लक्षणं दिसून येतात. कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि फुफ्फुसामधल्या छोट्या छोट्या हवेच्या पिशव्या असतात, ज्यांना ‘अलव्हिओलाय’ म्हणतात, त्यांना डॅमेज करतो. हे आलव्हिओलाय फुफुसातून ब्लड कॅपीलरीजमार्फत   (रक्त्त केशिका) ऑक्सिजन RBC म्हणजे लाल रक्त पेशींना पुरवतो. या पेशी पुढे ऑक्सिजन शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचवतात. म्हणून हायपॉक्सिया (म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे) हा अत्यंत महत्वाचा इंडिकेटर आहे.  कोरोनाची तीव्रता, रुग्णाला त्वरित इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे की नाही.. या बाबी म्हणून शरीरातल्या ऑक्सिजनच्या पातळीवर अवलंबून आहेत आणि इथे पल्स ऑक्सिमीटर हे छोटंसं उपकरणं कामी येऊ शकतं.   

पल्स ऑक्सिमीटर वापरायचं कसं ?

आपल्या शरीरातील आक्सिजनची मात्रा मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटचा वापर केला जातो.  ऑक्सिमीटरमध्ये  बोट ठेवून काही सेकंदात  त्याच्या स्क्रीनवर आपल्याला शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण दिसतं. बोटाला कोणत्याही प्रकारची इजा अथवा वेदना यामध्ये होत नाही. डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी पल्स ऑक्सिमीटर, कोरोनाची गंभीरता जोखण्यासाठी कसं उपयुक्त आहे याबात न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. इमर्जन्सी मेडिसिनमध्ये गेली तीस वर्ष काम करणारे डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी या लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी लोकांमध्ये पल्स ऑक्सिमीटर चे रिडींग हे ९५ ते ९८ टक्के असं असतं. जर रुग्णाच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण 92 -94 टक्क्यांच्या खाली असेल तर डॉक्टरांशी बोलून, रुग्णाला मग इस्पितळात भरती करण्याची गरज आहे की नाही हे ठरवावं. जो पर्यंत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे ९५ च्या वर आहे, श्वास घेण्यास विशेष अडचण नसेल तर कोरोना योग्य वैद्यकीय उपचारांनी घरच्या घरी बरा होऊ शकतो 

पल्स ऑक्सिमीटर बोटाला कोणतीही सुई न टोचता कसं काम करतं?

पल्स ऑक्सिमीटरमध्ये नुसतं एक बोट ठेवून, कोणतीही सुई शरीरात न जाता, हे उपकरण कसं काय आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण मोजतं  हे आपण आता पाहूया. इलेकट्रोनिक प्रोसेसर असलेल्या या  ऑक्सिमीटरमध्ये जेव्हा आपण आपलं बोट  ठेवतो, तेव्हा दोन एल ई डी  डायोड्स आणि फोटोडायोड च्या मार्फत  रेड आणि निअर इन्फ्रारेड असे दोन प्रकारचे प्रकाश किरणं आपल्या बोटावर पडतात.  आपल्या शरीरातील ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबीन (जे ऑक्सिजन वाहून नेतं) हे ९४० नॅनोमीटर वेव्हलेंथवर ( तरंगलांबी) इन्फ्रा रेड लाईट एबझॉर्ब करतं ( शोषून घेतं) आणि डीऑक्सिजनटेड हिमोग्लोबिन हे ६६० नॅनोमीटर वेव्हलेंथवर रेड लाईट एबझॉर्ब करतं. काही सेकंदासाठी ही सायकल सुरु राहते. यानंतर किती प्रकाश प्रसारित झाला (ट्रांसमिटेड लाईट) मोजल्या जातो. करेक्शन फॅक्टर लावून मग ऑक्सिजनेटेड आणि डीऑक्सिजनटेड हिमोग्लोबिनचा एक रेशिओ काढल्या जातो. प्रोसेसरच्या साहायाने ( बिअर- लॅम्बर्ट लावून ) SpO२ (सॅच्युरेटेड ऑक्सिजन) चं प्रमाण काढल्या जातं,जे आपल्याला ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर दिसतं. 

पल्स ऑक्सिमीटरवर आलेलं रिडींग आणि कोरोनाची लागण यांचा काय संबंध आहे?

सो हा जो काही आकडा ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर आपल्याला पाहायला मिळतो तो आकडा म्हणजे आपल्या शरीरातील सॅच्युरेटेड ऑक्सिजनचं प्रमाण असतं. समजा ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर ९७ टक्के असं रिडींग आलं याचा ढोबळ अर्थ असा तुमच्या शरीरात ९७ टक्के होमोग्लोबीन हे ऑक्सिजन वाहून नेतं आहे.  जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो आणि आपली प्रतिकारशक्ती त्याचा सामना करू शकत नाही, तेव्हा हा आजार बळावतो आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे फुफ्फुसांवर हल्ला करतो ज्यामुळे ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि आपल्याला SpO२ म्हणजेच ऑक्सिमीटरवर दिसणारं रिडींग कमी होत जातं आणि म्हणून कोरोना झालेल्या व्यक्तीने पल्स ऑक्सिमीटर वापरणं, दिवसांतून विशिष्ट वेळा ठरवून रिडींग घेणं, एका रीडिंगवर निर्णय न घेता, रीडिंगचा पॅटर्न बघणं आणि तो सतत कमी असेल तर आपल्या डॉक्टरशी चर्चा करून इस्पितळात भरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे.

कोणतं ऑक्सिमीटर विकत घ्यावं?

जे लोक हाय रिस्क ग्रुपमध्ये नाहीयेत त्यांना रोज ऑक्सिमीटरच्या  चाचणी गरज नाही. तसंच कोरोनाची लक्षणं जाणवली तरचं ऑक्सिमीटर वापरणं इष्ट.  प्रत्येकाला  ऑक्सिमीटर विकत घेणं परवडणारं नसेल तर सोसायटीमध्ये एक असं घेता येऊ शकतं. इथे कोणताही एक असा ब्रँड मी नमूद करत नाहीये कारण तो या लेखाचा मुद्दा नाहीये. साधारण कंपनीचं नाव, सगळे डिटेल्स नीट छापलेले असतील, एखादं सर्टिफिकेशन असेल असं उपकरण घेणं हिताचं. आपल्या नेहेमीच्या औषध विक्रेत्याला विचारून सुद्धा रिलाएबल ब्रँड आपण घेऊ शकता.  

आॅक्सिजन मोजण्यासाठी  मोबाईल वरचे ऍप्स वापरावे का? 

अजून एक महत्वाची गोष्ट ही मोबाईलवर सुद्धा ऑक्सिजन मोजण्याचे ऍप्स आहेत पण खूप सारे रिसर्चर्स, डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार या ऍप्सची अचूक मोजमाप करण्याची  विश्वसार्ह्यता कमी आहे. तसंच सध्या ऑक्सिमीटरच्या काही फसव्या लिंक्स सुद्धा पसरवल्या जात आहेत हे ऍप्स आपण डाउनलोड केले आणि ऑक्सिजन चेक करण्यासाठी आपलं बोट सेन्सरला लावलं की आपले फिंगरप्रिंट डिटेल्स आणि पर्सनल डेटा आणि बँक अकाउंट डिटेल्स वगैरे चोरीला जाण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारचा सायबर क्राईम आहे त्यामुळे विश्वासार्ह्यता पडताळल्याशिवाय या पद्धतीचे कोणतेही एप  डाउनलोड करणं शक्यतो टाळा   मी जो सिद्धांत सांगितला आहे तो नीट वाचल्यास तुमच्या लक्षात येईल की या उपकरणामध्ये डायोड्सची क्वालिटी उत्तम असणं हे अचूक रिझल्टसाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून शक्यतो चांगलं उपकरण वापरणं हे अधिक योग्य ठरेल. आपण  रिडींग घेतल्यावर घरातल्या इतर लोकांचं देखील रिडींग घेणं आणि त्यानुसार उपकरण कॅलीब्रेट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपण जे उपकरण वापरतो आहोत ते योग्य आणि अचूक रिडींग दाखवतं आहे हे पडताळून बघत राहणं महत्वाचं!  

6MWT-  सिक्स मिनिट वॉक टेस्ट

हाय रिस्क ग्रुपमध्ये किंवा ज्यांच्या मध्ये  कोरोनाचं निदान झालं आहे आणि ऑक्सिजन लेव्हल ९४ टक्क्यांच्या खाली असेल अशा लोकांकरिता  6MWT म्हणजेच सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ सुचवली जात आहे. कधी कधी कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना सुद्धा लोक कारण नसताना ऑक्सिमीटर वापरतात आणि अचानक एखाद्या वेळी रिडींग कमी आलं की घाबरून जातात. अशा वेळी सुद्धा ही चाचणी घरच्या घरी  करून बघता येऊ शकते. टेस्ट सोपी आहे.  चालायच्या आधी एकदा ऑक्सिमीटरवर रिडींग घेणे. मग सहा मिनिटांकरिता नॉर्मल गतीने चालणे. हृदयरोगाचा त्रास असेल आणि चालताना खूप धडधड वाढली  अथवा श्वास घेताना त्रास होत असेल तर हे लगेच थांबवावे. सहा मिनिटे चालल्यावर मग पुन्हा रिडींग घेऊन पाहावे. जर खूपच थकवा जाणवला आणि रिडींग ३ टक्क्याने खाली गेलं तर मात्र मग आपल्या डॉक्टरशी संपर्क साधावा.  “द लॅन्सेट” या मेडिकल जर्नलमध्ये कोरोनामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी झालेल्या पेशन्ट्सना प्रोन पोझिशन म्हणजेच पोटावर झोपवल्यास त्यांच्या ऑक्सिजन पातळीमध्ये वाढ झाल्याचं  दिसून आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅनिक न होता, घाबरून न जाता आपल्या डॉक्टरशी नीट बोलत राहिल्यास, प्रशासनाला कळवल्यास आणि योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास, हातपाय न गाळता सतर्क राहिल्यास आणि अंतर – पथ्याचे ( सोशल डिस्टंसिंग) सर्व नियम योग्य पद्धतीने पाळल्यास कोरोना पासून आपला बचाव होऊ शकतो.
: *श्वास नलिका* आणि *अन्न नलिका* ह्या दोन वेगळ्या आहेत.  आपण जर नेहमी गरम पाणी पिऊन घश्याची, अन्ननलिकेची सुरक्षा बघत असाल तर खूपच चांगलं आहे, व ती होतही असते.  पण श्वसन मार्गाचे काय ?  अजून एक पॅरानेझल सायनस म्हणून नाकाच्या पाठीमागेएक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचं लॉकिंग मेकॅनिझम असते त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकतः तिथे अडकतात.  परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसांपर्यंत पोहोचतात.  सुरवातीला तिथल्या जंतूंच्या वास्तव्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत नाही, परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसां पर्यंत पोहोचतात.  आणि नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो.  जर त्या जंतूंना पॅरानेझल सायनस मध्येच मारायचं असेल तर स्टीम घेणे अती आवश्यक.  आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. 
साधारणपणे ४० डिग्री सेन्टीग्रेड ची वाफ हि त्या व्हायरसला पांगळा करते. ६० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरस ला पांगळी करते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. ७० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ हि व्हायरसला पूर्ण पणे मारते.  संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग, हा स्टीम वर आहे. 
श्वास नलिकेतून संसर्ग थेट फुप्पुसांपर्यंत पोहचतो, म्हणून स्टीम घेणे कायम फायदेशीर आहे. 
आता ती कशी घ्यायची ?  जर घरातच असाल तर एकदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही भाजी किंवा काहीही खरेदी करायला बाहेर जात असाल तर दोनदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही लोकांना ऑफिस मध्ये भेटत असाल तर तीनदा घ्यायची.  जर कोण थेट कोविड रुग्णाची काळजी घेत असेल संपर्कात असेल तर दर दोन तासांनी वाफ घेणे अती आवश्यक आहे.  तर आता आपणच आपली काळजी घ्यायची आहे. 
म्हणजेच गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोर पणे पाळलात तर आपण सुरक्षित राहाल.

Thursday, 27 August 2020

Enhancement in food production for 12th Science......11chapter.....Biogas



बायो-सीएनजी.  . .... बायोगॅस
 
बायोगॅस हा अनेक वायूंचे मिश्रण आहे व त्यामधील मिथेन हा प्रमुख ज्वालाग्राही वायू असतो. नेहमीच्या वापरातील कोणतेही डिझेल इंजिन काही थोडे बाह्य़ तांत्रिक बदल (रेट्रो-फिटिंग) करून बायोगॅस व डिझेलच्या मिश्रणावर चालवता येते. या पद्धतीला ‘डय़ुएल फ्युएल’ इंजिन पद्धती म्हणतात. या पद्धतीने ६५-७० टक्के डिझेलची बचत साधता येते. अशा ‘डय़ुएल फ्युएल’ इंजिनचा वापर मुख्यत: विद्युतनिर्मितीसाठी केला जातो. निसर्गत: उपलब्ध होणाऱ्या सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) चासुद्धा प्रमुख घटक मिथेन असतो. आज आपल्या देशात तसेच जगभर सीएनजीचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी आणि वाहनइंधन म्हणूनही केला जातो. यासाठीचे तंत्रज्ञान आता पूर्णत: विकसित झालेले आहे. भारतातील अनेक शहरे वाहनांमध्ये सीएनजी वापरात आणण्यामुळे प्रदूषणमुक्त होण्याचा मार्गावर आहेत.

बायोगॅसमधील मिथेन शुद्ध स्वरूपात मिळवल्यास सीएनजीऐवजी तितक्याच कार्यक्षमतेने वापरता येतो. यासाठी सुरुवातीला बायोगॅसमधील मिथेन वायूचे विलगीकरण विविध प्रक्रियांच्या माध्यमातून केले जाते. या प्रक्रियांतून ९५ टक्क्यांपर्यंत शुद्ध स्वरूपात मिथेन वायू मिळवला जातो. ते पुढे २५० ते ३०० बार प्रेशरला (१ बार = १ किलोग्रॅम बल/ सेंटिमीटर वर्ग) विशिष्ट प्रकारच्या सिलेंडर (कम्पोझिट सिलेंडर)मध्ये भरला जातो. या प्रकारे मिळवलेल्या इंधनाला आज ‘बायो-सीएनजी’ किंवा ‘बायो-मिथेन’ म्हणून ओळखले जाते. हे सिलेंडर पुढे विद्युतनिर्मिती करणाऱ्या जनरेटरला किंवा कोणत्याही वाहनाला इंधन पुरवठा करण्यासाठी जोडता येतात. मिथेनच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून मोठय़ा प्रमाणावर सल्फर हे उप-उत्पादन प्राप्त होते.

आज भारतात विविध प्रकारच्या जैव-विघटनशील पदार्थापासून- म्हणजे मुख्यत: शेण, तेल बियांची पेंड, साखर कारखान्यातील प्रेसमड (घट्ट मळी), फळे-भाजी बाजारामधील निरुपयोगी कचरा आणि शिळे व टाकाऊ अन्नपदार्थ यांच्यापासून- मोठय़ा प्रमाणावर बायो-सीएनजी निर्माण केला जातो. महाराष्ट्रात पुणे येथे बांबू व नारळ शहाळ्याच्या टरफलापासून बायो-सीएनजीची निर्मिती व त्याचा वाहनइंधन म्हणून उपयोग २०१६ साली यशस्वीरीत्या करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या बायोगॅसवर चालणारी बस कोलकाता येथे एप्रिल २०१७ मध्ये कार्यरत झाली आहे. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करून वीजनिर्मिती करू शकणारी भारतीय कंपन्यांची जनित्रे (जनरेटर्स) आता उपलब्ध झाली आहेत.

Wednesday, 19 August 2020

Producers

*जीवसृष्टीतील प्राथमिक उत्पादक!*

जीवसृष्टीतील सर्वच सजीवांना त्यांच्या त्यांच्या विविध जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी उपलब्ध असलेली ऊर्जा ही विशिष्ट प्रकारच्या रासायनिक घटकांच्या रूपात असते. सूर्याचे किरण पृथ्वीवर येतात आणि सारा आसमंत उजळून टाकतात, तेव्हा या किरणांमधील विकिरण ऊर्जा (रेडियंट एनर्जी) ग्रहण करून ती जीवावरणातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची प्राथमिक जबाबदारी निसर्गाने विविध प्रकारच्या परिसंस्थांचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या हरित वनस्पतींकडे सोपवली आहे. मग ती रानावनात, जंगलांमध्ये, देवरायांमध्ये दाटीवाटीने वाढणारी झाडे-झुडुपे असोत किंवा खाडय़ा-समुद्र यांच्या लगतच्या दलदलीत वाढणारी खारफुटींची जंगले असोत अथवा नद्या, तलाव, सागर, महासागर यांच्या पाण्यातील अतिसूक्ष्म हरित किंवा वनस्पती प्लावके असोत; या सर्वाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वत:ला आणि संपूर्ण जीवसृष्टीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अन्नरूपी (रासायनिक) ऊर्जेचा पुरवठा करणे.

यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे हवेत असलेला कार्बन डायऑक्साइड हा वायू आणि जमिनीत असलेले विविध पोषक द्रव्यांनी युक्त असे पाणी. या हरित वनस्पती त्यांच्या पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या असंख्य सूक्ष्म छिद्रांमधून हवेतील कार्बन डायऑक्साइड आत घेतात आणि मग हा वायू पानाच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे वनस्पतींचीमुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि ते पानांमधील प्रत्येक पेशीला पुरवतात. पानाच्या प्रत्येक पेशीमध्ये एक अतिशय प्रभावी यंत्रणा कार्यरत असते. पेशींच्या अंतर्गत असलेले ‘हरित लवके’ (क्लोरोप्लास्ट) नावाचे मुख्य ‘अवयव’ (ऑरगॅनेल्स) या यंत्रणेचा एक प्रमुख भाग आहेत. सूर्याची विकिरण ऊर्जा शोषून घेण्यासाठी या हरित लवकांची अंतर्गत रचना अतिशय वैशिष्टय़पूर्ण असते. यामध्ये अतिशय सूक्ष्म अशा गोल आकाराच्या ‘तबकडय़ा’ असतात आणि त्या एकमेकांना जोडलेल्या असतात. या तबकडय़ांमध्ये ‘क्लोरोफिल’ नावाचे रंगद्रव्य (पिग्मेन्ट— एक प्रकारचे प्रथिन) असते. याचे वेगवेगळे प्रकार असतात. याशिवाय झॅन्थोफिल आणि अ‍ॅन्थोसायनिन या नावाची रंगद्रव्येदेखील असतात.

सूर्याचा प्रकाश पानांच्या पृष्ठभागावर पसरतो तेव्हा क्लोरोफिलचे रेणू विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांमधील ऊर्जा वापरून कार्बन डायऑक्साइड व पाणी यांचा संयोग घडवून आणतात आणि अतिशय गुंतागुंतीच्या रासायनिक अभिक्रियांच्या माध्यमातून अंतिमत: ग्लुकोज ही साखर तयार होते. या रासायनिक अभिक्रिया पार पडत असताना संपूर्ण जीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन या वायूची निर्मिती होऊन तो बाह्य वातावरणात सोडला जातो. अशा रीतीने हरित वनस्पतींद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर ग्लुकोजरूपी रासायनिक ऊर्जेत करण्यात येते.

Tuesday, 28 July 2020

मतीमंद मूल

*मूल मतिमंद असण्याचे कारण काय?* 
**********************************

बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.

मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.

शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादीमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालकामधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं;
अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.

एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल. गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...