" लॉकडाऊन मध्ये मी केलेले काम "
लॉकडाऊन काळात मी खरे जीवन जगले. दैनंदिन जीवनात नुसतीच धावपळ अन् दगदग यामुळे स्वतःकडे, घराकडे,स्वतःच्या अभिरुचींकडे ,मुलांकडे , कुटुंबाच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष होतं ,याची जाणीव प्रकर्षाने झाली.
नवीन गोष्टींचा शोध घेण्याची क्षमता माणसात पूर्वीपासून चालत आलेली आहे. माणसाने शेतीचा शोध लावला,चाकाचा शोध लावला आणि त्यातून स्वतःचा, कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा विकास केला. नवीन गोष्टींच्या शोधामुळे माणसाला त्याचे जगणे आनंदी, सोपे कमी कष्टाचे करता आले. विविध आजारांवर उपचार करता आले. नवीन गोष्टींचा शोध घेण्याची सवय ही आपल्याला कायम फायद्याची ठरत आलेली आहे. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जसे कष्ट करावे लागतात त्याचप्रमाणे नवीन गोष्टी शिकल्याने, त्यांचा शोध घेतल्याने आपल्याला आपला विकास करता येतो. नवीन माहिती मिळवल्याने आपण या काळात चांगल्या प्रकारे जगू शकतो.आपण मोबाईल वापरायला शिकलो तर आपली बरीच कामे जागेवरून होतात. अनेक हेलपाटे वाचतात. नवीन गोष्टींमुळे आनंद सुद्धा होतो. शिकण्याची पण मजा असते. नवीन गोष्टी शिकायची मनाची तयारी हवी. त्यामुळे नवनवीन खूप काही समजते, करता येते. नवीन गोष्टींची माहिती घेतल्यामुळे आपल्याला स्वतःचा विचार करायची सवय लागते. नव्या तरुण पिढीशी चांगले जमू शकते. उगीचच वयस्कर झाल्यासारखे वाटतात नव्या उमेदीने जगायला उत्साह वाढतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे उदाहरण याबाबतीत आपल्याला लक्षात घेता येईल.टिळक जेव्हा मंडाले येथे सहा वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांच्या वयाची पन्नाशी उलटली होती. तरीही त्यांनी व्याकरणाची पुस्तके मागवून त्यावरून जर्मन व फ्रेंच भाषांवर अभ्यास करून प्राविण्य मिळवले होते, यालाच म्हणतात नवीन गोष्टींचा शोध घेणे व त्यातून बोध घेणे. यातून माणूस ज्ञानी तर होतोच पण त्याचबरोबर विचारही व्यापक होतात म्हणून नावीन्याचा शोध घेणे ही आयुष्य सुंदर करणारी गोष्ट आहे.
आपण विचार कसा करतो, वाचन कसं करतो, त्यावर मनन आणि चिंतन काय करतो यावर आपले आयुष्य अवलंबून असतं. आपण जर उदात्त आणि सात्विक विचार बाळगत असू तर आपला चेहरा हे सात्विक दिसतो आणि मन देखील प्रसन्न राहते. जर आपल्याला आयुष्यात चांगले जीवन जगायचे असेल, आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा विचार करणे व त्यावर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी सर्वप्रथम मी माझी दिनचर्या नियमित ठेवली . दररोज सकाळी माझ्या कुटुंबा सोबत सामूहिक प्रार्थना केली. कारण ज्या-ज्यावेळी समाजावर संकट कोसळले त्या-त्यावेळी सामुदायिक प्रार्थना करूनच ईश्वराला जागविण्याची व समाजाची विस्कटलेली घडी दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त ठरते असे अनेक दाखले आपल्या प्राचीन ग्रंथात दिले आहेत. त्यानुसार
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सांगतो निरामय: l
सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नयात l
या जगातील सर्व लोक सुखी राहोत, सर्व आरोग्यमान होवोत व सर्वांना आपल्या कल्याणाचे मार्ग दिसोत,जाणता येवोत, कोणी कोणत्याही प्रकारे दुःखी न होवो. अशी प्रार्थना करून आमची सारी दिनचर्या सभ्यतेने, समतेने, निर्मलतेने, शांतीने आणि निष्कामतेने व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिली. माझा थोरला मुलगा न्यूयार्क येथे उच्च शिक्षणासाठी असल्यामुळे त्याची काळजी वाटत होती म्हणून प्रार्थनेने सकारात्मक ऊर्जा मिळाली. त्याच्याशी व्हिडिओ कॅमेर्याने संपर्क साधून पॉझिटिव्ह दृष्टीकोण ठेवण्यासाठी सतत प्रेरणा दिली. समतोल आहार ,व्यायाम आणि वाचनाची जोड देऊन शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला.
काय होतं नेमकं नेहमीपेक्षा वेगळा विचार केल्यावर? तर आपल्या समस्या, आपले प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो. लॉक डाउन काळात गृहिणी , एक शिक्षिका ,आई ,पत्नी, लेक म्हणून अनेक स हैमस्या उद्भवल्या. परंतु जीवनाकडे सकारात्मक पणे पाहिले तर आपण आपल्या समस्या, प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. आपण स्वावलंबनासाठी प्रेरित होतो. अनेक कामे आपण एकट्याने करू शकतो. आपला जीवन विषयक दृष्टिकोन व्यापक होतो. इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच इतरांना मदत करायला पुढे धावतो. एखाद्या प्रश्नाकडे विविधांगांनी बघता येणे यामुळे सहज शक्य होते. मन आनंदी राहते. आपल्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये ही बदल होण्यास मदत होते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला खूप काम करावे लागते, या सर्व धावपळीत मानसिक ताण तणाव आलाही आपण सामोरे जात असतो. अशावेळी आपण चिंता करत बसण्यापेक्षा जर दररोजच्या पेक्षा वेगळा विचार केला तर आपणहून आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सहज शक्य होते. याचबरोबर जीवनात आपण अनेक गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो. या काळात मी अनेक गोष्टी नव्याने शिकली. काही गोष्टी मी पहिल्यांदाच केल्यात. त्यात मुलाच्या व माझ्या यजमानांची केसांची कटींग मी पहिल्यांदाच घरी केली व ती अत्यंत उत्तम प्रकारे केली याचे प्रमाणपत्रही ही त्या दोघांच्या पसंतीतून मिळविले. कारण लॉकडाऊन काळात केसांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती आणि सलून बंद होते .त्यामुळे मला ती एक चांगली संधी प्राप्त झाली. मला माझ्यातील एका नव्या कौशल्याचा शोध लागला. एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. एप्रिल व मे महिना प्रचंड ऊन असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चकल्या, वेफर्स, कुरडाया, शेवया,पापड ,मसाले व इतर वाळवण देखील मी स्वतः तयार करून वर्षभर पुरेल इतका साठा करून ठेवण्यात यशस्वी झाली. जे यापूर्वी मी कधीही केले नव्हते. याकामी मला आई, माझा मुलगा व माझे यजमान यांचे मोलाचे सहकार्य लाभले, यातून मला अविस्मरणीय आनंद मिळाला. तसेच गच्चीवरील कुंड्यांमध्ये व रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, डबे यांचा वापर करून परसबागेत चाफा, बोगनवेल, गुलाब, जास्वंद , पानफुटी अनेक नवीन रोपांची लागवड केली. उपलब्ध जागेतच मेथी,कोथंबीर व इतर पालेभाज्यांची लागवड केली. जुन्या कपड्यांपासून 500 हून अधिक पिशव्या प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून तयार केल्यात. घरीच उपलब्ध असलेल्या कापडांपासून मास्क तयार करून वाट लेत.तसेच रोज माझ्या एका सहकारी, स्नेही, नातेवाईक, मित्रमंडळी यापैकी एका सोबत फोन ने संपर्क साधला .वर्तमान परिस्थिती बद्दल सकारात्मक चर्चा केली . तसेच गुजरात मधून नवापूर मार्गे जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी दररोज वीस पोळ्यांची मदत मी दहा दिवस नियमितपणे आमच्या नवापूर येथील अस्तित्व या स्वयंसेवी संघटनेला केली.
इयत्ता बारावी चा अभ्यासक्रम २०-२१ या शैक्षणिक वर्षात बदलला म्हणून नवीन पुस्तक आल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोट्स तयार केल्यात.तसेच Mrs.Megha Patil हे युट्युब चॅनेल सुरू करून आतापर्यंत दहा ते बारा युट्युब बनवून त्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केल्यात. अल्प कालावधीतच अनेक सबस्क्राईबरही मिळालेत. तसेच मी गेल्या चार वर्षांपासून Meghapatils.blog.spot या माझ्या ब्लॉग वर लिहीणे सुरु केले आहे,त्यात खासकरून विद्यार्थ्यांसाठी कोरोना विषयी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव जागृती विषयक माहिती लिहिली. यासाठी मी इंटरनेट समूह संपर्काची माध्यमे व सोशल मीडिया यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. तसेच दररोज काहीतरी कविता, लेख अशा प्रकारचे साहित्य लिहिण्याचा संकल्प केला .
ना सा येवतीकर या उपक्रमशील शिक्षकांनी दररोज एक विषय देऊन स्पर्धा घेऊन ब्लॉग वाचण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यात मी सहभागी होऊन एका लेखात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच त्यांनी तयार केलेल्या ई बुक मध्ये माझ्या पर्यावरण हा लेख प्रसिद्ध झाला. खालील प्रमाणे मी या काळात लेखन केले व त्यास प्रसिद्धीही मिळाली.
दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत हिरकणी व व्यसनाधीनता या कवितांना ही प्रसिद्धी मिळाली . तसेच रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकात दिनांक 30 एप्रिल रोजी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा , 9 मे रोजी कष्ट आणि जीवन ,29 मे रोजीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय . शिक्षक ध्येय या डिजिटल साप्ताहिकात "असे कसे झाले "या कवितेला व शैक्षणिक क्षेत्रातील उपाय योजना या लेखांना प्रसिद्धी मिळाली.
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नवापूर आयोजित वेबिनार सीरिजमध्ये हे दिनांक 2 मे ते 16 मे पर्यंत सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पतिशास्त्र परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन केले. तसेच ऑनलाईन अनेक अभ्यासक्रमांची संधी चालून आली तिचाही मी तितकाच तत्परतेने उपयोग करून घेतला. कारण शिक्षणासाठी कोणाचा काळ हा बदलाचा काळ आहे.आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण एक शिक्षकी व्यवस्थेपासून पुढे जाऊन "one on one learning" कडे अग्रेसर होणार आहोत. कारण लोक डाऊन मुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा बदल घडला आहे शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व मलाही कळले. बहुतेक सर्वच विद्यार्थी नेहमीच ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीचा स्वीकार करण्यास तयार असतात ,म्हणून शिक्षक या नात्याने मी देखील ऑनलाइन शिक्षणाकडे स्मार्ट डिवाइस आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे ज्ञानाची शिदोरी संग्रहित करू शकली. तंत्रज्ञान आणि शिक्षकांच्या मदतीने कठीण आहून कठीण वाटणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज आणि परिणामकारक पद्धतीने समजतात. इतकेच नव्हे तर ऑनलाईन लर्निंग मध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात शिक्षकाची भूमिका वाढते हे देखील लक्षात आले विषयातील संकल्पना अधिक रंजक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी शिक्षक म्हणून मी काय केले पाहिजे? हे मला कळून चुकले. प्रत्येक आव्हान एक संधी देत असते. लोक डाऊन चा काळ हा शिक्षणव्यवस्थेतील बदलाचा टप्पा आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतींचा विस्तार होत असतानाच नव्या पिढीला डिजिटल स्क्रीन त्यांच्या नव्या जगाची जोडत आहे. अध्ययनाच्या या नव्या मॉडेलचा अधिकाधिक वापर व वाढ होत राहील. यापूर्वीच्या काळात एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना शिकवीत असत परंतु आता पुढे जाऊन आपण वन ऑन वन लर्निंग या अध्ययन सूत्रांकडे वळलो आहोत याची कल्पनाही आली. म्हणून ऑनलाइन शिक्षणाकडे शिक्षकांपासून पालकांपर्यंत विद्यार्थ्यांनासाठी सर्वांनीच जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र ऑनलाइन कडे वळत आहे ही सुखद घटना म्हणावी. अर्थात हे बदल काळाच्या गरजेनुसार करण्यात येत असून दुसरा पर्याय नसल्यामुळे स्विकारला जातोय. म्हणून मी क्षणाक्षणाला कणाकणाने ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला.
या काळात आंतरिक जगाकडे पाहण्याची विशिष्ट व अचानक संधी मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच हलक्या स्वरात का होईना अंतर्मनातील आवाज ऐकायला मिळाला. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या गोष्टी आहेत तशाच स्वीकारण्यात तर जीवन जगणे अगदी सोपे होते. आत्मनिर्भर होणे म्हणजे काय ?याची प्रचिती आली. जीवनात आपण अनेक गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो यासाठी एक उदाहरण पाहू.
बर्नर हा तरुण एका फोटोग्राफर कडे काम करीत होता. त्याच्या स्टुडिओत एक गिऱ्हाईक एकदा एक खगोल शास्त्रावरील पुस्तक विसरला. हे पुस्तक बर्नर घरी घेऊन गेला आणि रात्रभर जागून त्याने ते पुस्तक वाचून काढले त्या पुस्तकातून भरला स्फूर्ती मिळाली आणि त्याने चार इंची दुर्बिण खरेदी केली .त्यात चार इंची दुर्बिणीने तो आकाश निरीक्षण करू लागला. आकाश निरीक्षणांचा क्रम त्याने रोज रात्री चालू ठेवला. त्यामुळे त्याचा अभ्यास वाढत गेला. त्याला खगोलशास्त्रातील थक्क करणारी माहिती मिळाल्यावर त्याच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. आता त्याने थोडी मोठी दुर्बीण खरेदी केली आणि आकाशाचा त्याचा अभ्यास रोज वाढू लागला. लवकरच त्याच्या मेहनतीला फळ मिळाले, त्याला समजलेली आकाशातील अनेक रहस्ये त्याने जगासमोर मांडली. हे सर्व यश बर्नर ला तेथे विसरलेल्या पुस्तका मुळेच लाभले . एका पुस्तकाच्या रूपाने त्याच्यासमोर संधी चालून आली होती, त्याचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला .खरोखर त्या वेळी त्याने वेगळा विचार केला नसता तर तो खगोल शास्त्राचा अभ्यासक होऊच शकला नसता. परंतु त्याने नेहमीपेक्षा वेगळा विचार केला आणि आयुष्यात यशस्वी झाला .आपल्यालाही जर मिळवायचे असेल तर अनेक मार्ग खुले असतात फक्त त्या मार्गांचा शोध घेण्यासाठी आपण नेहमीपेक्षा वेगळा विचार करणे जास्त महत्त्वाचा आहे हे मला या लॉकडाऊन काळात कळून चुकलं.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
संदर्भ सूची
खालील माझे लेख व कविता प्रसिद्ध झालेत.
22 एप्रिल_ जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल_ जागतिक पुस्तक दिन
28 एप्रिल _शाळेतील गमती जमती
29 एप्रिल _लोभ किंवा लालच
1 मे_कष्ट आणि जीवन
3 मे_आई
5 मे _जैवविविधता
8 मे_ रक्तदान
10 मे _जन्म आणि मृत्यू
20 मे_मुलींचे शिक्षण
3 जून _पर्यावरण ....... श्रीमती मेघा अनिल पाटील.
http://meghapatils.blogspot.com/2020/06/blog-post_6.html
दिव्य मराठी पेपर- मधुरिमा पुरवणी हिरकणी व व्यसनाधीनता या कविता .
१)रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकात दिनांक 30 एप्रिल रोजी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ,
२)9 मे रोजी कष्ट आणि जीवन ,
३)29 मे रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय
४)शिक्षक ध्येय या डिजिटल साप्ताहिकात "असे कसे झाले "ही कविता.
५)तंत्रज्ञानाधारित अध्ययनात आपल्या शिक्षणाचे भवितव्य.... बैजू रविंद्रण...Byju's app चे संस्थापक आणि सीईओ दिव्य मराठी 10 जून 2020 पेज नंबर 2.
६)पॉझिटिव्ह थिंकिंग. .. पद्माकर नसते सोनाली प्रकाशन पेज नंबर 66