Friday, 3 July 2020

लेख

*लेखक, ब्लॉगर, कवी, स्थंभलेखक, वैचारिक लेखक इ. साठी विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर आपले साहित्य प्रसिद्ध करण्याची संधी*

खालीलपैकी आपल्या आवडीच्या विषयावर आपले लेख, कथा, कविता, विचार इ. लिहा आणि आम्हाला ईमेलवर पाठवा. सर्व पात्र साहित्य, वि.म. परिषदेच्या ब्लॉगवर आपल्या नाव, ईमेल आणि संपर्क क्रमांकासहित प्रसिद्ध केले जाईल. त्याचबरोबर परिषदेच्या सोशल मिडियावर शेअर केले जाईल. 

*📌खालील नियम व सूचना वाचा आणि आपले साहित्य पाठवा*
१) या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

२) आपले साहित्य पुढील ब्लॉगवर प्रसिद्ध होणार आहे. – https://www.vishwamarathiparishad.org/blog

३) कथा / लेख इ. किमान ५०० आणि कमाल २००० शब्दांचे असावेत.

४) कविता लेखन - किमान १२ ते कमाल ३० ओळी

५) *आपले साहित्य फक्त* vmparishad@gmail.com *या ईमेलवरच पाठवायचे आहे.*

६)  खाली दिलेल्या विषयांव्यतिरिक्त इतर लिखाण पाठवू नये.

७) साहित्य *युनिकोड* मध्ये टाईप करुन इमेलवर पाठवा. PDF/Image पाठवू नये.

८) इमेलमध्ये आपले नाव, मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक, स्त्री/पुरुष, शहर ही *माहिती* पाठवावी. साहित्य आणि माहिती एकाच इमेलमध्ये पाठवावी. खालीलपैकी कोणत्या विषयावर लेखन केले आहे तो विषय नमूद करावा.

९) लेखन व्यवस्थित टाईप करावे. सुटसुटित मांडणी, योग्य ठिकाणी परिच्छेद, व्याकरण इ. काळजी घ्यावी. शक्य असल्यास लेखासंबधित संलग्न चित्र / कव्हर फोटो पाठवावा.

१०)  एक व्यक्ती एकच लेख/कथा/कविता पाठवू शकते. परिषदेचे आजीव सभासद असाल तर सर्व विषय मिळून एकूण १० लेख/कथा/कविता पाठवू शकता. 

११)  इमेल पाठवताना ईमेलचा विषय – *“वि.म.प ब्लॉगसाठी - <* आपल्या लेख/कवितेचे नाव *>”*. 

१२)  या उपक्रमाला मुदत नाही. प्रथम प्रवेश, प्रथम प्राधान्य असेल. दररोज सुमारे ३ ते ५ पोस्ट प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

१३) आपल्या लिखाणामध्ये सकारात्मकता असावी. भारतीय संस्कृती, देश, परंपरा इ. विषयी आदर असावा. समाजात तेढ वाढविणारे नसावे.

१४) साहित्य स्वीकारण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय विश्व मराठी परिषदेच्या संपादकीय मंडळाचा असेल. त्याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.

१५) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण

*विषय:* 
▪️साहित्य, संस्कृती आणि ग्रामिण संस्कृती/परंपरा
▪️लोकसाहित्य
▪️सामाजिक ज्वलंत विषय
▪️करिअर आणि कौशल्ये
▪️शैक्षणिक उपक्रम
▪️युवकांची स्वप्ने आणि समस्या
▪️उद्योजकता
▪️सामाजिक विषमता
▪️उत्सवांचे बदलते स्वरुप
▪️आरोग्य
▪️नागरिकांचे कर्तव्य व अधिकार
▪️कायदे साक्षरता
▪️सामाजिक साक्षरता
▪️पौराणिक इतिहास
▪️आध्यात्म व धार्मिक विषय
▪️पर्यावरण
▪️जीवनशैली आणि व्यवस्थापन
▪️सांस्कृतिक इतिहास
▪️सांस्कृतिक पर्यटन / प्रवास वर्णन
▪️अध्यात्म व धार्मिक विषय
▪️विविध भारतीय कला
▪️लोकनाट्य, नृत्य
▪️मानसशास्त्र
▪️विनोदी ललित साहित्य
▪️कुटुंब शिक्षण / कल्याण 
▪️आयुष्यातील प्रेरणादायी घटना
▪️मला आवडलेले पुस्तक

_सहभागी व्हा तसेच वाचक म्हणून सुद्धा ब्लॉग वाचा, प्रतिक्रिया द्या, आवडले तर शेअर करा._

*विश्र्व मराठी परिषद*
व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262
संकेतस्थळ: www.vishwamarathiparishad.org

हे आवाहन आपल्या अधिकाधिक साहित्यिक मित्रांना शेअर करा.

Sunday, 14 June 2020

पर्यावरण शिक्षण

*पर्यावरण शिक्षणाचा निर्णय*

मानव आणि निसर्ग व पर्यावरण यांच्यातील दुरावलेल्या नातेसंबंधांचा नव्याने मागोवा घेण्यासाठी आणि या नातेसंबंधांतील निसटलेले दुवे शोधून ते पुन्हा जोडता येतील का याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा १९७२ साली जून महिन्यात स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत ११२ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेचे सकारात्मक परिणाम लवकरच दृश्य स्वरूपात जाणवू लागले. या ऐतिहासिक परिषदेनंतर जागतिक पातळीवर निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन करण्याच्या हेतूने भारतासारख्या राष्ट्रांनी अनेक महत्त्वाचे कायदे केले. भारतीय संविधानात १९७६ साली या अनुषंगाने ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या ‘मूलभूत कर्तव्यां’त अनुच्छेद ५१ अ(ग) जोडण्यात आले. यानुसार ‘वने, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे’ हे नागरिकांचे कर्तव्य ठरते. परंतु नागरिकांना या तरतुदींची जाणीव करून देऊन त्यांच्यात निसर्गारक्षणाप्रति संवेदनशीलता जागरूक करण्यासाठी आणि त्यांना ‘पर्यावरण साक्षर’ बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण, अभ्यासक्रम गरजेचा होता. याच दरम्यान पर्यावरण हा स्वतंत्रपणे शिकवण्याचा विषय होणे आवश्यक आहे आणि हा विषय औपचारिक अथवा अनौपचारिकरीत्या अगदी लहान, संस्कारक्षम वयोगटातील मुला-मुलींपासून ते तरुण त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्तींपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे याची जाणीव जागतिक पातळीवर वाढीस लागली.

युनेस्कोच्या आधिपत्याखाली १९७५ साली त्या काळातील युगोस्लाविया देशातील बेलग्रेड या शहरात पर्यावरण शिक्षणाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. नंतर दोनच वर्षांनी (१९७७) पुन्हा युनेस्को आणि यांच्या वतीने तत्कालीन सोविएत रशियातील जॉर्जिया प्रांतात असलेल्या तिबिलीसी या शहरात केवळ पर्यावरण शिक्षणावर साधकबाधक चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत आधुनिक काळातील पर्यावरण शिक्षणाचा पाया रचला गेला आणि पर्यावरणाचे ‘विज्ञान’ किंवा ‘शास्त्र’ म्हणून विचार आणि अभ्यास सुरू झाला.

Saturday, 13 June 2020

सर्व 12 वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

*मेडीकल* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
----------------------------------------------------
1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र 
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी Transfer certificate
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
----------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
----------------------------------------------------*इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
----------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिं ट
2) MHT-CET* पत्र 
3) MHT-CET* मार्क  लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी Transfer certificate
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते                                         13) फोटो.

----------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
----------------------------------------------------
*वैद्यकीय क्षेत्र* 
----------------------------------------------------
*शिक्षण - एमबीबीएस* 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएएमएस* 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएचएमएस* 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीयूएमएस* 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीडीएस* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच* 
कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

----------------------------------------------------
*शिक्षण - डिफार्म* 
----------------------------------------------------
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश 
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीफार्म* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म 
------------------------------
संरक्षण दलांत प्रवेशासाठी 
------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
 
------------------------------
*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*
 ------------------------------
*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश 
*शिक्षण - बीई* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस 
*शिक्षण - बीटेक* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी - 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण 
कालावधी - दोन वर्षे 
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण 

----------------------------------------------------
 *कॉम्प्युटरमधील कोर्सेस* 
------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल 
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ 
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - दोन वर्षे 
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - सहा महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 
कालावधी - तीन महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग 
कालावधी - दहा महिने 
इग्नू युनिव्हर्सिटी 
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 
कालावधी - एक वर्ष 
----------------------------------------------------
*शिक्षण - बारावी*
 ------------------------------
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 
कालावधी - एक वर्ष 
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट 
कालावधी - दोन महिने 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स 
कालावधी - एक वर्ष 
(फक्त मुलींसाठी) 
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग 
कालावधी - दोन वर्षे 
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट 
कालावधी - एक वर्ष 
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन 
कालावधी - एक वर्ष 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट 
कालावधी - एक वर्ष 
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 
कालावधी - एक वर्ष 

------------------------------
 *रोजगाराभिमुख कोर्सेस*
 ------------------------------
*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता - बारावी (70 टक्के) 
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड 
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी 
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स 
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर 
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - दहावी आणि बारावी पास 
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर 
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग 
फाउंडेशन (एनटीटीएफ) 
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस 
कालावधी - एक वर्ष 
फॅशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - एक वर्ष 
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस 
कालावधी - तीन वर्षे 

------------------------------
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
 ------------------------------
*टूरिस्ट गाइड* 
कालावधी - सहा महिने 
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस 
कालावधी - दीड वर्ष 
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग 
कालावधी - तीन महिने 
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन 
सिस्टम (एअर टिकेटिंग) 
कालावधी - एक महिना 
अप्रेन्टाईसशिप 
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे 
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी* 
डिजिटल फोटोग्राफी 
कालावधी - एक वर्ष 
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग 
कालावधी - एक ते तीन वर्षे 
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी 
कालावधी - एक ते तीन वर्षे.
------------------------------
*बांधकाम व्यवसाय*
 ------------------------------
*शिक्षण - बीआर्च* 
कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र,NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक  
*पारंपरिक कोर्सेस*
 ------------------------------
*शिक्षण - बीएससी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट 
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.
------------------------------
*शिक्षण - बीएससी(Agri)* 
कालावधी - 4 वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन 
------------------------------
*शिक्षण - बीए* 
कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
-----------------------------
*शिक्षण - बीकॉम* 
कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएसएल* 
कालावधी - पाच वर्षे 
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा 
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 
------------------------------
*शिक्षण - डीएड* 
कालावधी - दोन वर्षे 
प्रवेश - सीईटी आवश्‍यक 
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक 
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड 
----------------------------------------------------
*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम 
कालावधी - तीन वर्षे 
प्रवेश - सीईटी 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए  

------------------------------
*फॉरेन लॅंग्वेज* 
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, 
जॅपनीज, कोरियन) 
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर 
कोर्सेसवर आधारित
-----------------------------------------------------
 *फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*
------------------------------
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. 
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा. 
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. 

अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 

अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. 

इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. 

काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा. 
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा. 
-----------------------------
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
 
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. 
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) 
www.dte.org.in 
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) 
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) 
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ 
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) 
www.iitb.ac.in 
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण 
www.aipmt.nic.in 
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी) 
www.upsc.gov.in

Saturday, 6 June 2020

पर्यावरण दिनानिमित्त

।श्रीराम।



वटपौर्णिमा 

*वटपौर्णिमा  व  'जागतिक पर्यावरण दिन'*

              आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे  आपल्या लगेच लक्षात येईल. मग ती दिवाळी असो शिमगा, मकरसंक्रांत असो की रक्षाबंधन, गणपती असो की गोपाळकाला!! आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. *'ज्याला कृष्णाचा 'काला' समजला त्याला वेगळी 'राष्ट्रीय एकात्मता' शिकविण्याची बिलकुल गरज नाही'* असे एक वचन प्रसिद्ध आहे.
         *कुणाला चुकून जरी पाय लागला तर नुसते 'क्षमस्व' किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं 'सॉरी' म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने 'नमस्कार' करणारी आपली संस्कृती आहे*. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज  कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते. आजची प्रसारमाध्यमे तर हिंदूधर्माला नावे ठेवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे असे समजून ह्यावर निरर्थक चर्चा झोडतात. जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( 'अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी' ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम 'ख्रिसमस ट्री' बनविताना आणि आकाशातून 'सांताक्लाज' नावाचा कोणी  'देवदूत' येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते. 
                ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. ह्या वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी 'व्रत' धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.
*"सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|*
*तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|*
*अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |*
*अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||"*
वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया  *`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे'*, अशी प्रार्थना करतात.
                आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणारी वनस्पति आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. *दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे  वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!*. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. 'पुसंवन' विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत. सध्याच्या काळात सिमेंटच्या जंगलामध्ये राहणाऱ्या आणि मातीशी नाळ तुटलेल्या आजच्या आधुनिक पिढीला झाडाझुडांची ओळख तरी कशी होणार ? आणि झाडांची ओळखच नसेल तर त्याचा खरा उपयोग कोणाला कळणार? 
               श्री गोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. *'आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच'*. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा सनातन वैदिक हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि  त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.
                  खरंतर *'वटपौर्णिमा' हाच वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. *वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व 'तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे'* आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही 'जाणीव' त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या 'कहाणी'चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित  केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे. 
                ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. *म्हणून 'वडाचेच पूजन का?' हा प्रश्नच गैर आहे असे वाटते*. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. *निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!*
            स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पुजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत 'स्त्री'ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी 'कोमल' ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी 'दुर्गा'ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. *चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते.*  स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. *कोणत्याही गोष्टीचे 'मर्म' न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.*
         हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. *वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल*. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या 'आत्मारामा'स विसरला नाही तर त्याला 'स्व'रूपाची नक्कीच ओळख होईल. *आत्मारामाची ओळख करून घेण्यातच  मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे 'आत्मारामाची भेट' !!!*
          *ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील  मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर  सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान सात जन्म अर्थात हजार वर्षे  तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?* 
     पूर्वी लग्न ही 'संस्कार' म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रियांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला 'मनुष्यत्व ते देवत्व' असा प्रवास करायचा आहे अर्थात 'आनंताचा' प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.
            आज विवाहामागील  'संस्कार' लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे.* सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज 'वटपौर्णिमा' साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली 'कुटुंब व्यवस्था' अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो.
आपल्या 'कुटुंबरुपी' वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.


Friday, 5 June 2020

पर्यावरण दिनानिमित्त

मराठी विज्ञान परिषद
      पर्यावरणीय माहिती प्रणाली*

पर्यावरणाचा सातत्याने होत असलेला ऱ्हास आणि मानवी आरोग्यावर तसेच इतर जैविक संसाधनांवर याचे होत असलेले गंभीर दुष्परिणाम हा गेल्या काही दशकांपासून चिंतेचा विषय झाला आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनातील धोरणकर्ते, राज्यकर्ते तसेच पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक-विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक या सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राखणे गरजेचे आहे. या साऱ्यांना पर्यावरणविषयक शास्त्रीयदृष्टय़ा अचूक आणि परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यांना विविध समस्यांची व्याप्ती कळेल आणि त्या अनुषंगाने पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेता येईल.

हेच उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने १९८२ च्या डिसेंबरमध्ये ‘पर्यावरणीय माहिती प्रणाली’ (एन्व्हॉयर्न्मेंटल इन्फॉर्मेशन सिस्टीम- एन्व्हिस) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत पर्यावरणविषयक माहिती शासकीय संकेतस्थळांवर संकलित करून अद्ययावत केली जाते. पर्यावरणाशी संबंधित विविध क्षेत्रांतील शास्त्रीय माहिती विविध मार्गानी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. ही संकलित माहिती धोरणात्मक निर्णय घेणारे अभियंते आणि शास्त्रज्ञांनाही उपयुक्त ठरते. यासाठी विविध पर्यावरणविषयक मुद्दय़ांवरील माहितीचा संग्रह, त्यांची संगतवार मांडणी आणि विविध पर्यावरणीय विषयांचा प्रसार यासाठी एक परिपूर्ण कार्यजाळे (नेटवर्क) तयार करण्याची योजना या उपक्रमात आखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध संकेतस्थळे आणि ऑनलाइन डेटाबेस यांचाही समावेश यात करण्यात आला आहे.

हे काम विकेंद्रित स्वरूपात चालते. मंत्रालय स्तरावर नियंत्रण करणारे मुख्य केंद्र आणि देशाच्या विविध भागांत विषयानुरूप उभारण्यात आलेली केंद्रे अशी या उपक्रमाची रचना आहे. प्रदूषण, घातक रसायने यांमुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय समस्या असोत की पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे कल्पक प्रयत्न किंवा पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाचा वापर असो; त्यांसंदर्भातील माहितीचे संकलन करणे, त्या त्या पर्यावरणीय विषयातील पुस्तके, अहवाल, लेख आदी संदर्भसाहित्याचा संग्रह करणे, आवश्यक असेल तेव्हा ही किंवा अन्य माहिती केंद्रीय स्तरावर उपलब्ध करून देणे ही देशभर विखुरलेल्या ‘एन्व्हिस’ केंद्रांची जबाबदारी असते. तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून पर्यावरणीय माहितीचा समृद्ध स्रोत निर्माण करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

महाराष्ट्रात अशा प्रकारचे ‘एन्व्हिस’ केंद्र २००३ पासून कार्यरत झाले. या केंद्राद्वारे http:// www.mahenvis.nic.in/ या संकेतस्थळावर पर्यावरणविषयक अहवाल, मूलभूत माहिती, कायदे, योजना, बातम्या, छायाचित्रे, विविध संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०१० पासून या केंद्रामार्फत पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निबंध, लेख, घोषवाक्य तसेच छायाचित्र स्पर्धाचे आयोजन केले जाते.

Tuesday, 26 May 2020

Biodiversity

       जैवविविधता.. निसर्गाची सहकारी बँक!*
आपल्या भोवतालच्या सुंदर निसर्गाचा ‘बँकिंग’ किंवा ‘अर्थशास्त्र’ यांसारख्या तुलनेने रुक्ष वाटणाऱ्या विषयांशी ‘अर्था’अर्थी काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भारतात अतिशय विपुल प्रमाणात जैविक संसाधने आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात आपण त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. अर्थव्यवस्था व जैवविविधता यांचा घनिष्ठ संबंध आहे. परंतु या जैविक संसाधनांना मानवाने आतापर्यंत  कधी ‘किंमत पट्टी’ (प्राइज टॅग) लावलेली नाही; त्यामुळे त्यांची किंमत कळालेली नाही!

वास्तविक जगात महाजैवविविधता असलेल्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश असून आतापर्यंत वनस्पतींच्या ४५ हजार, तर प्राण्यांच्या ९१ हजार प्रजातींची अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जगातील जैवविविधतेच्या एकूण ३६ हॉटस्पॉट्सपैकी चार हॉटस्पॉट्स भारतात आहेत.

परंतु गेल्या काही दशकांमध्ये जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या नैसर्गिक घडामोडींमुळे आणि प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेच्या सातत्याने होत असलेल्या ऱ्हासाचे देशाच्या अर्थकारणावर होणारे दुष्परिणाम लक्षात येत गेले आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याची निकड जाणवू लागली. राज्यकर्त्यांना आणि धोरणकर्त्यांना हे गणित समजावून सांगण्यासाठी जैवविविधतेचे रीतसर मूल्यमापन आणि जागतिक बाजारपेठेत त्याची ‘किंमत’ ठरवण्यासाठी आता देश-विदेशातील अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. यामध्ये नुकतेच ‘टायलर’ पुरस्काराने सन्मानित झालेले आणि जागतिक ख्यातीचे ‘हरित अर्थतज्ज्ञ’ म्हणून ओळखले जाणारे पवन सुखदेव आघाडीवर आहेत. जैवविविधतेचे मूल्य मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांनाही त्याचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी २००८ साली संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाच्या पुढाकाराने एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाने ‘पर्यावरणाचे अर्थशास्त्र’ या विद्याशाखेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत जैवविविधतेचे जतन करण्याचे महत्त्व पटू लागले. आजघडीला भारतात आणि इतर देशांमध्येदेखील आशिया डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक या व इतर अनेक संस्थांमध्ये पर्यावरणाच्या अर्थतज्ज्ञांना मोठी मागणी आहे. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖

Wednesday, 22 April 2020

23 April



*२३ एप्रिल*

*जागतिक पुस्तक दिन (World Book Day)*
               वाचनसंस्कृती

  United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिवस व  इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
लेखक, कवी , प्रकाशक , मुद्रक आणि वितरक यांचे महत्व अधोरेखित करणे.
लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे. मला इयत्ता पाचवीत निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिक मिळाले आणि तेंव्हा पासूनच खऱ्या अर्थाने माझे लेखन सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत गेल्या 40 वर्षांत मी अनेक काव्य, निबंध , ललित लेख लिहिले. त्यातील काही बक्षिसप्राप्त ठरले, काही प्रसिद्ध झालेत , तर काही पुन्हा एकदा लिहावे असे वाटले.
ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे
त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.
वाचन म्हणजे एका व्यक्तीचे विचार, मते व्यक्त केल्यानंतर त्या विचारांचा  प्रवेश आपल्या मनात होत असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. आपले अनुभव विश्व अधिक समृद्ध होते व आपण मनन,चिंतन, मंथन करून वर्तनात बदल घडवून आणतो.
        वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. ज्यामुळे वाचकांना एका उच्च प्रतीची तात्विक बैठक लाभते. याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातच नव्हे तर समाज मनावर परिणाम होतो, यात तिळमात्र शंका नाही. वाचनाचे व्यसन वाढविण्यासाठी आपण  प्रयत्न केले पाहिजेत. उदा. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात यावीत, कुणालाही वाढदिवशी पुस्तकेच भेट द्यावीत.
सर्वांना वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  श्रीमती मेघा अनिल पाटील
      उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार
मोबाईल  नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...